आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 52 वा सामना शनिवारी (31 ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झाला. या सामन्यात हैदराबादचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीची महत्वाची विकेट घेतली. या कामगिरीमुळेच त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. सामन्यानंतर त्याने त्याच्या योजनेबद्दल माहिती दिली.
पॉवरप्लेमध्ये घेतले महत्वाचे बळी
हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने पॉवरप्लेमध्ये युवा वेगवान गोलंदाज संदीप शर्माला गोलंदाजी दिली. या गोलंदाजाने कर्णधाराला अजिबात निराश केले नाही. डावाच्या तिसर्या षटकात संदीपने आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडीक्कलला त्रिफळाचित केले. त्यानंतर पाचव्या षटकात त्याने आरसीबीला मोठा धक्का दिला. आपल्या तिसर्या षटकातील चौथ्या चेंडूवर संदीपने दिग्गज फलंदाज आणि आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला बाद केले. विराटने संदीपच्या चेंडूवर कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला पण पुढे उभा असलेला क्षेत्ररक्षक केन विल्यमसनने त्याचा झेल घेतला.
चेंडू स्विंग होतं होता -संदीप
संदीपने या सामन्यात किफायती गोलंदाजी केली आणि चार षटकांत केवळ 20 धावा दिल्या. या कामगिरीसाठी संदीपची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. सामन्यानंतर संदीप म्हणाला की, “जेव्हा मी गोलंदाजीला सुरुवात केली तेव्हा खेळपट्टीवर चेंडू थांबून येत होता. मी यष्टीमध्येच चेंडू फेकण्याचा प्रयत्न करत होतो. मैदानात वातावरण थंड असल्याने चेंडू चांगलाच स्विंग होत होता.”
जॉनी बेयरस्टो करत होता मदत
तो म्हणाला, ‘मी नकल बॉल टाकत होतो आणि जॉनी बेयरस्टोची मदत घेत होतो, तो मला नवीन चेंडूने गोलंदाजी कशी करायची याबबाबत माहिती देत होता. गोलंदाजीत माझ्या योजना अमलात आणण्यात तो मला मदत करत होता.”
कोहलीची विकेट नेहमीच असते खास
कोहलीला बाद केल्याबद्दल संदीप म्हणाला की, “कोहली एक महान फलंदाज आहे. त्याची विकेट घेणे नेहमीच खास असते. आम्ही आता चांगल्या फॉर्ममध्ये परत येत आहोत. आम्ही आगामी सामन्याबद्दल उत्साहित आहोत.”