भारतीय क्रिकेटचा परिघ जगभरातील क्रिकेट खेळणाऱ्या देशात सर्वात मोठा आहे. बीसीसीआयशी तब्बल ३८ क्रिकेट संघटना संलग्न आहेत. देशांतर्गत स्पर्धांची रेलचेल वर्षभर सुरू असते. त्यात, आयपीएलसारखे व्यासपीठ भारतीय युवा खेळाडूंना मिळाले आहे. यामुळे, याचा फायदा होण्यासोबतच काही तोटे होतात. अनेकदा काही प्रतिभावान खेळाडू राष्ट्रीय संघात निवडले जात नाहीत किंवा त्यांना अतिशय कमी संधी मिळते. अमोल मुजुमदार, मिथुन मन्हास, धीरज जाधव, रजत भाटिया हे अफाट गुणवत्ता असलेले खेळाडू कधीही भारतासाठी खेळणे नाहीत. तर तर दुसरीकडे, फक्त आयपीएलच्या प्रदर्शनावर सुदीप त्यागी, मनप्रीत गोनी, गुरकिरत सिंग यांसारखे खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करून गेले.
काही खेळाडू असेही होते ज्यांना त्यांच्या प्रतिभेच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळाले पण ते कमनशिबी ठरले. कारण, त्यांच्या जागी संधी मिळालेल्या दुसऱ्या खेळाडूने आपल्याला मिळालेली संधी दोन्ही हातांनी पकडली. असाच एक गुणवान खेळाडू गुणवत्ता असूनही आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द जास्त लांब घेऊन जाऊ शकला नाही. तो खेळाडू म्हणजे भारताचा माजी फलंदाज सुब्रमण्यम बद्रीनाथ. आज(३० ऑगस्ट) बद्री ४१ वर्षाचा होतोय.
बद्रीनाथ हा लहानपणापासून सचिन तेंडुलकरचा मोठा चाहता होता. त्याची क्रिकेटबद्दलची ओढ पाहून त्याच्या वडिलांनी त्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. वडिलांनी कडक शिस्तीत त्याच्याकडून फलंदाजीचे तंत्र घोटून घेतले. यानंतर बद्रीनाथचा दाखला चेन्नईतील प्रतिष्ठित पद्मशेषाद्री बालभवन शाळेत घातला गेला. क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन, गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, अभिनेते सूर्या आणि रामचरण तेजा हे सर्व त्यावेळी पद्मशेषाद्री बालभवन शाळेत शिकत होते.
बद्रिनाथने २००० मध्ये तामिळनाडूसाठी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २००४ मध्ये, त्याने दक्षिण विभागाकडून खेळताना दुलीप ट्रॉफी स्पर्धेत इंग्लंड ए संघाला पराभूत करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. त्यावेळी, इंग्लंड संघात एड स्मिथ, केव्हिन पीटरसन, मायकेल लंम्ब, मॅट प्रायर, ग्रॅहम नेपियर, जेम्स ट्रेडवेल, साजिद महमूद आणि सायमन जोन्स यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश होता. विजयासाठी मिळालेल्या ५०१ धावांचा पाठलाग करताना बद्रीनाथने वेणुगोपाल रावसह पाचव्या गड्यासाठी २१२ धावांची भागीदारी केली. या सामन्यात बद्रीनाथने शतक तर रावने द्विशतक झळकावत एक अविस्मरणीय मिळवून दिला होता.
सन २००५-२००६ रणजी हंगामात बद्रीनाथ राष्ट्रीय स्तरावर प्रकाशझोतात आला. त्याने सात सामन्यांत ८० च्या सरासरीने ६५६ धावा केल्या. एक सामना कमी खेळल्यामुळे ३६ धावांनी पिछाडीवर राहिल्याने तो त्या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनू शकला नाही. या कामगिरीनंतर त्याला तामिळनाडूच्या कर्णधारपदाचा मान मिळाला. पुढच्या सत्रात त्याने आणखी जोरदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी आपली निवड करण्यास निवडसमितीला भाग पाडले. मात्र, अंतिम अकरामध्ये त्याला संधी मिळाली नाही. त्यावेळी, भारतीय फलंदाजी क्रमात वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि युवराज सिंग यांच्यासारखे दिग्गज असल्याने त्याला आपली जागा बनवता आली नाही.
घरगुती क्रिकेटमध्ये सातत्याने धावा केल्या तरीही बद्रीनाथची निवड न होणे दुर्दैवी होते. २००८ मध्ये जेव्हा भारत श्रीलंकेच्या दौर्यावर गेला तेव्हा, जखमी सेहवागच्या जागी १८ वर्षीय विराट कोहलीला संधी देण्यात आली. वारंवार दुर्लक्ष केले गेल्याने, बद्रीनाथने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत उद्विग्न होऊन म्हटले होते की, “मला अपयशी होण्याची तरी संधी द्या. जर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये माझी योग्यता सिद्ध करू शकलो नाही, तर पुन्हा एक शब्दही बोलणार नाही. पण, मी एक संधी मिळवण्यास तरी पात्र आहे.”
याच दौर्यादरम्यान सचिन तेंडुलकर दुखापतग्रस्त झाला तेव्हा, बद्रीनाथला पाचारण केले गेले. दांबुला येथील फलंदाजीसाठी अवघड असणाऱ्या खेळपट्टीवर बद्रीनाथने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (एकदिवसीय) पदार्पण केले आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन २७ धावांची नाबाद खेळी करत त्याने संघाला विजय मिळवून दिला. मात्र, त्यानंतर झालेल्या दोन एकदिवसीय सामन्यात तो अपयशी ठरला आणि पुढच्या संधीसाठी त्याला तीन वर्षे वाट पाहायला लागली.
साल २००८ आयपीएलमध्ये पदार्पण करीत बद्रीनाथने चेन्नई सुपर किंग्जकडून सहा हंगाम खेळले. त्याने चेन्नईसोबत दोन आयपीएल विजेतेपदे व चॅम्पियन्स लीग विजेतेपद जिंकले होते. चेन्नईचा मिस्टर डिपेंडेबल म्हणून त्याला ओळखले जात.
आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर दोन वर्षांनी त्याने भारतीय संघासाठी कसोटी पदार्पण केले. फेब्रुवारी २०१० मध्ये बद्रीनाथने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नागपूर येथे आपला पहिला कसोटी सामना खेळला. त्याने पहिल्याच डावात ५६ धावा ठोकल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५९ ची सरासरी असूनही, बद्रीनाथ भारतासाठी अवघे दोन कसोटी सामने खेळायची संधी मिळाली. कमनशिबी बद्रीनाथ आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत सात एकदिवसीय सामने, दोन कसोटी सामने व एक टी२० असे केवळ दहा आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकला.
मध्यंतरी असादेखील खुलासा झाला होता की, २००८ मध्ये, धोनीने कोहलीचा खेळ पाहिला नसल्याने तो बद्रीनाथला राष्ट्रीय संघात स्थान देण्यासाठी आग्रही होता. २००८मध्ये विराट कोहलीच्या जागी तेव्हा कर्णधार एमएस धोनी व बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांना सुब्रमन्यम बद्रिनाथ संघात हवा होता. तेव्हा एमएस धोनी व नंतर प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना विराटच्या एकंदरीत गुणवत्तेबद्ल शंका होती. तेव्हा भारताच्या युवा संघाने तेव्हा ऑस्ट्रेलिया दौरा केला होता, त्यात विराटने चांगली कामगिरी केली होती.
तेव्हा श्रीलंका दौऱ्यावर जात असलेल्या भारतीय संघात १९ वर्षाखालील २००८ विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूंना दिलीप वेंगसरकर यांना संधी द्यायची होती. वेंगसरकर यांनी या दौऱ्यासाठी कोहलीची निवड केली व त्यांना याची मोठी किंमत मोजायला लागल्याचे त्यांनी २०१८मध्ये सांगितले होते. वेंगसरकर यांना काही महिन्यांतच नंतर निवड समितीच्या प्रमुख पदाचा राजीनामा द्यावा लागला व कृष्णमाचारी श्रीकांत यांची या पदावर निवड झाली.
तेव्हा बद्रिनाथ व विराट अशा दोघांचीही त्या दौऱ्याला संघात निवड झाली होती. विराटने १८ ऑगस्ट २००८ तर बद्रिनाथने २०ऑगस्ट २००८ रोजी वनडे पदार्पण केले. मात्र, निवड समितीने विराटला संधी दिली आणि पुढे इतिहास घडला.
वाचा- तेव्हा धोनीला नको होता विराट टीम इंडियात, या खेळाडूला द्यायची होती विराटच्या जागी संधी
जवळपास १५ वर्ष तामिळनाडूकडून खेळल्यानंतर, २०१५ मध्ये तो विदर्भ रणजी संघात दाखल झाला. २०१६ मध्ये प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा टप्पा त्याने पार केला.
अनेक चांगल्या खेळाडूंप्रमाणे, बद्रीनाथदेखील चुकीच्या काळात जन्मल्याने त्याला प्रतिभे इतपत संधी आणि प्रसिद्धी मिळाली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
खूशखबर! टोकियो पॅरालिम्पिकमध्ये योगेश कथूनियाचे रुपेरी यश; भारताला मिळवून दिले पाचवे पदक
मोठी बातमी! भारताकडून ४ धावांत ६ विकेट्स घेणारा स्टुअर्ट बिन्नी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त