---Advertisement---

गोष्ट एका क्रिकेटरची: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान

---Advertisement---

सन 2003च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने 7 षटकात 67 धावा दिल्या होत्या. त्यातील पहिल्याच षटकात त्याने तब्बल 15 धावा दिल्या होत्या, पण या खराब कामगिरीतून शिकून पुढे त्याने 2011च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात 3 निर्धाव षटके टाकण्याची कामगिरी केली. त्यावेळी तो भारताचा 2011 विश्वचषकातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. तो गोलंदाज म्हणजे नगरचा मराठमोळा झहीर खान. झहीर शनिवारी (दि. 07 ऑक्टोबर) आपला 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याच्या कारकीर्दीवर टाकलेली एक नजर…

दिनांक 7 ऑक्टोबर 1978 ला झहीर खान (Zaheer Khan) याचा जन्म शिर्डीपासून 40 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या श्रीरामपूर येथे झाला. त्याचे वडील फोटोग्राफर होते, तर आई शिक्षिका होती. त्याला दोन मोठे भाऊ आहेत. दोघेही उच्चशिक्षित आहेत. झहीरने हिंद सेवा मंडळाच्या मराठी शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले आणि नंतरचे शिक्षण केजे सोमय्या माध्यमिक शाळेतून केले. त्यानंतर एक क्रिकेटपटू म्हणून असलेली प्रतिभा लक्षात घेत त्याच्या वडीलांनी त्याला मुंबईत आणले. इथे आल्यानंतर त्याने पहिले दोन वर्षे नॅशनल क्रिकेट क्लबकडून जवळजवळ सर्व स्पर्धेमध्ये भाग घेतला. एका अंतिम सामन्यात तर त्याने शिवाजी पार्क जिमखाना विरुद्ध 7 विकेट्स घेत मुंबई क्रिकेट वर्तुळात ओळख मिळवली. त्यानंतर काही दिवसातच त्याला 1998-99 च्या मोसमात 19 वर्षांखालील मुंबई आणि पश्चिम विभागाच्या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. त्याची डेनिस लिली यांच्या मदतीने चन्नईत स्थापन झालेल्या एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्येही निवड झाली.

यादरम्यान शालेय शिक्षणानंतर झहrरला मॅकेनिकल इंजिनियरिंगसाठी प्रवेश मिळाला होता. मात्र त्याचे प्रशिक्षक सुधीर नाईक यांनी त्याला क्रिकेटवर लक्ष देण्यास सांगितले. यादरम्यानचा एक मजेशीर किस्सा असा की युवा झहीरला विमानात बसण्याची भीती वाटायची. त्यामुळे एकदा मुंबई रणजी संघाच्या संभाव्य संघाबरोबर मध्यप्रदेशला प्रवास त्याला करायचा होता. हा प्रवास विमानाने करायचा असल्याने घाबरलेल्या झहीरने त्याचे प्रशिक्षक विद्याधर पराडकर यांना विचारले होते, ‘सर तूम्ही माझ्याबरोबर याल का? मला विमानाची भीती वाटते.’

पण काही केले तरी झहीरची वरिष्ठ मुंबई संघात निवड होईना. शेवटी मग त्याने बडोदा संघाकडून खेळण्याचे ठरवले आणि त्याने बडोदा संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यावेळी त्याने 8 सामन्यात 35 विकेट्स मिळवल्या. 2000-01 च्या रणजी मोसमात झहीरने रेल्वेविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात बडोदाकडून 8 विकेट्स घेतल्या आणि बडोद्याला रणजीचे विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. त्याच्या या कामगिरीमुळे त्याची भारतीय संघातही निवड झाली. त्याने 2000ला झालेल्या आयसीसी नॉकआऊट टूर्नामेंटमध्ये केनियाविरुद्ध खेळताना आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. याच सामन्यातून भारताचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगनेही पदार्पण केले होते. झहीरने पहिल्याच सामन्यात 3 विकेट्स घेतल्या. त्याच्या पुढच्याच सामन्यात त्याने त्याच्या 22व्या वाढदिवसाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना ऍडम गिलख्रिस्ट आणि स्टिव्ह वॉ या महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. झहीरची कामगिरी पदार्पणाच्या वर्षात चांगली सुरु होती. त्याने 2000 लाच कसोटी पदार्पणही केले. गांगुलीने हेरलेल्या अनेक युवा क्रिकेटपटूंपैकी झहीर हा देखील भारतीय क्रिकेटला मिळालेला एक हिरा होता.

सन 2000 मधील एक खास किस्सा म्हणजे 8 डिसेंबरला झिम्बाब्वे विरुद्ध झालेल्या वनडे सामन्यातील. सध्याच्या झिम्बाब्वे संघासारखा हा झिम्बाब्वे संघ नव्हता. त्यावेळीचा एक चांगला समजला जाणारा झिम्बाब्वेचा संघ होता. त्या सामन्यात सचिन सोडला तर भारताचे अन्य फलंदाज फक्त मैदानात हजेरी लावून गेले होते. सचिनने तशी एकाकी झुंज देताना 146 धावांची खेळी केली होती. त्यावेळी हेन्री ओलोंगाची सचिनने चांगलीच धूलाई केली होती. त्यामुळे भारताने 200 चा टप्पा ओलांडला होता. पण सचिन 47 व्या षटकात बाद झाला. त्यावेळी झहीर फलंदाजीसाठी आला. त्याने आणि अजित आगरकरने 49 षटकापर्यंत भारताला 250 धावांच्या वर पोहचवलं. पण शेवटच्या षटकात झहीरला काय झालं माहित नाही. झिम्बाब्वेकडून ओलोंगा हे षटक टाकण्यासाठी आला. पहिल्या दोन चेंडूवर झहीर आणि आगरकरने प्रत्येकी एकेरी धाव घेतली. त्याच्यानंतर झहीरने ओलोंगाच्या पुढच्या तीन चेंडूंवर तब्बल 3 षटकार मारले. ते पाहून सर्वच आश्चर्यचकीत झाले. झिम्बाब्वे संघालाही काही कळेना. ओलांगा टेंशनमध्ये आला. त्यामुळे त्याने शेवटचा चेंडू वाईड टाकला. त्यामुळे आणखी एक चेंडू झहीरला खेळण्यासाठी मिळाला. या चेंडूवरही झहीरने खणखणीत षटकार खेचला. भारताचा डाव ज्यावेळी 250 धावांवर उरकेल असे वाटले होते, तिथे झहीरच्या या आक्रमणामुळे भारताने त्याकाळी डोगंराएवढी वाटणारी 283 अशी धावसंख्या उभारली. पण एवढे करुनही भारताला मात्र तो सामना अँडी आणि ग्रँड या फ्लॉवर बंधूनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे गमवावा लागला. असे असले तरी त्यावेळी झहीरमधील फलंदाजीचे कौशल्य पहिल्यांदा सर्वांना पहायला मिळाले होते.

झहीरच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत व्हीव्हीएस लक्ष्मण त्याचा रुममेट असायचा. त्यावेळी त्यांच्यात अनेकदा मतभेदही होत असतं. त्या दिवसांची आठवण झहीरने सांगितली होती. त्याने सांगितले की तो वेगवान गोलंदाज असल्याने सराव केल्यावर दमुन जायचा. त्यामुळे रुममध्ये आल्यावर शुज, कपडे अशा वस्तू तो तशाच टाकून द्यायचा. पण हे काही लक्ष्मणला पटायचे नाही. त्यामुळे लक्ष्मणने एकदा त्याला सरळ विचारले ‘तू शुज जागेवर ठेवू शकत नाही का.’ त्यावर झहीर त्याला म्हणाला होता की ‘तूला काही प्रॉब्लेम होतोय का’. तर लक्ष्मणने ‘हो’ म्हटल्यावर झहीर त्याला सरळ म्हणाला, ‘मग तो प्रॉब्लेम तूझा आहे, तर तूच निस्तर मला का सांगतो.’ त्याचे हे उत्तर ऐकून नंतर दोघेही हसू लागले.

पुढे जवागल श्रीनाथ, आशिष नेहरा यांच्यासह झहीर देखील भारताचा प्रमुख गोलंदाज झाला होता. त्यांच्यासह भारताने 2003 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारली होती. पण तसा युवा असणारा झहीर अंतिम सामन्याचा दबाव हाताळू शकला नाही. पर्यायाने त्याने खूप धावा दिल्या. तो सामना भारत हरला. त्या स्पर्धत झहीरने 11 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या होत्या. पुढे श्रीनाथच्या निवृत्तीनंतर झहीर भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज झाला. याचदरम्यान झहीरच्या कारकिर्दीत एक मजेदार घटना घडली. ती म्हणजे 2005 ला पाकिस्तान विरुद्ध एक कसोटी सामना खेळत असताना स्टेडियममधील एका मुलीने ‘आय लव्ह यू झहीर’ असे लिहीलेले पोस्टर आणले होते. त्यावेळी ते पोस्टर पाहुन ड्रेसिंग रुममध्ये झहीरला युवराज त्रास द्यायला लागला. त्यावेळी झहीरला त्याने त्या मुलीला फ्लाईंग किसही द्यायला लावला. हा व्हिडिओ आजही युट्यूबवर पहायला मिळतो.

पण 2005 नंतर मात्र संघात नव्याने दाखल झालेल्या श्रीसंत, मुनाफ पटेल, आरपी सिंग यांच्यामुळे आणि झहीरला झालेल्या दुखापतींमुळे तो संघात आत-बाहेर होत राहिला. त्यावर्षी बीसीसीआयच्या वार्षिक मानधन करारातही त्याची ब श्रेणीतून क श्रेणीत घसरण झाली.

अखेर त्याने इंग्लंडमध्ये होत असलेल्या कौंटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा निर्णय ठरला. तो 2006 च्या काऊंटी क्रिकेट मोसमात 5 महिने खेळला. त्याने पहिल्याच सामन्यात 10 विकेट्स घेतल्या. त्यामुळे तो वॉर्सेस्टरशायरकडून पदार्पणात 10 विकेट्स घेणारा 100 वर्षातील पहिलाच खेळाडू ठरला. त्या मोसमात त्याने 78 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला ‘झिपी झॅकी’ हे टोपन नाव मिळाले. याचदरम्यान 2006 पासून झहीरने मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती.

झहीरने केलेल्या या कामगिरीमुळे त्याला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळाले. त्यानंतर मात्र सगळ्यांना त्याचे व्हर्जन 2.0 पहायला मिळाले. त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून यशस्वी पुनरागमन केले. त्या संपूर्ण दौऱ्यात त्याने 11 सामन्यात 29 विकेट्स घेतल्या. त्याच्यानंतर 2007 ला त्याने श्रीलंका आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेत चांगली कामगिरी करत 2007च्या विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवले. पण हा विश्वचषक भारतासाठी विसरण्यासारखी आठवण ठरला. या विश्वचषकानंतर जूलैमध्ये झालेल्या इंग्लंड दौऱ्यात झहीरने 3 सामन्याच्या कसोटी मालिकेत 18 विकेट्स घेतल्या आणि भारताने मिळवलेल्या मालिका विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. तो भारताचा इंग्लंडमधील 1986 नंतरचा पहिला कसोटी मालिका विजय होता.

याच मालिकेदरम्यान झहीर आणि केविन पिटरसनमध्ये झालेला वाद बराच रंगला होता. झाले असे की ट्रेंट ब्रिजला झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा डाव 198 धावांवरच संपुष्टात आला. या डावात झहीरने 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने 481 धावा केल्या. त्यावेळी 155 व्या षटकात झहीर फलंदाजी करत होता. तेव्हा इंग्लंड संघातील खेळाडूकडून जेली बिन्स मैदानावर टाकल्या जात होत्या आणि झहीरला डिर्स्टर्ब केले जात होते. झहीरने पंचांना देखील सांगितले. त्यावेळी झहीर आणि पिटरसनमध्ये वादावादीही झाली. चिडलेल्या झहीरने पुढच्या डावात त्याच इर्षेने गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतल्या. हे प्रकरण त्यावेळी गाजले होतं. झहीर असा क्रिकेटपटू होता जो शाब्दिक बाचाबाचीमध्ये बाकीच्यांना वरचढ ठरायचा. त्यामुळे शक्यतो त्याच्या नादी कोणी लागायचं नाही. त्यामुळे त्याच्याबाबतील असे स्लेजिंगचे किस्से फार कमी आहेत. असाच एक किस्सा म्हणजे, एकदा ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आलेली असताना ब्रेट ली आणि झहीरमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्याच्या पुढच्याच चेंडूवर झहीरने ब्रेट लीला थेट षटकार ठोकला. त्या षटकाराने ब्रेट लीला झहीरकडून त्याने केलेल्या स्लेजिंगचे उत्तर मिळाले होते.

स्लेजिंगचा आणखी एक किस्सा आहे. पण तो झहीरने केलेल्या नाही तर झहीरच्या नावाने भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज कर्णधार ग्रॅमी स्मिथला स्लेज केल्याचा आहे. झाले असे की स्मिथ हा झहीरचा बनी होता. तो बऱ्याचदा झहीरच्या गोलंदाजीवर बाद झाला होता. त्यामुळे एकदा 2006 ला दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान स्मिथ फलंदाजी करत होता. त्यावेळी भारताकडून कोणीही गोलंदाजी केली तरी भारतीय संघातील काही खेळाडू मधेच ‘वेल बॉल्ड झॅक!’ असे म्हणत स्मिथला त्रास देत होते. यावर बोलताना झहीर एका मुलाखतीत म्हणाला की ‘ती खूप मजेदार घटना होती. आणि त्यापेक्षाही गमतीचा भाग म्हणजे मला जास्त काही प्रयत्न करावे लागले नाही कारण जे महत्त्वाचे काम होते ते स्मिथच्या विचारांनीच केले होते.

सन 2008नंतर मात्र झहीरला सातत्याने दुखापतीचा सामना करावा लागला. असे असले तरी त्याची चांगली कामगिरीही या दरम्यान सुरु होती. 2010 ला त्यांने बांगलादेश विरुद्ध 10 विकेट्स घेतल्या. त्याआधी त्याने न्यूझीलंडमध्ये भारताने 2009 ला मिळवलेल्या पहिल्या कसोटी मालिका विजयातही महत्त्वाचा वाटा उचलला होता. 2010 ला त्याला खांद्याची दुखापत झाली. पण त्यानंतरही त्याने 2011 च्या विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यात यश मिळवले.

हा विश्वचषक अनुभवाने परिपक्व झालेल्या झहीरसाठी खास ठरला. त्याने या विश्वचषकात 21 विकेट्स घेतल्या. तो पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीसह स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. त्याने श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामन्यात 3 निर्धाव षटकेही टाकली होती. हा विश्वचषक जिंकल्यानंतरचा एक मजेदार घटना अशी की 2 एप्रिलला भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशी झहीरच्या रुममध्ये विश्वचषकाची ट्रॉफी होती आणि त्यावेळी आशिष नेहरा आणि त्याची पत्नी व मुलगा उपस्थित होता. त्यावेळी नेहराने तब्बल 25 जणांचा नाश्ता मागवला होता. पण सर्वजण सकाळी झोपायला परत गेल्याने तिथे नेहरा, त्याचे कुटुंब, झहीर एवढेच उरले आणि रुममध्ये विश्वचषक, अनेक वृत्तपत्रे आणि तब्बल 25 जणांचा नाश्ता तसाच पडला होता.

या विश्वचषकानंतर झालेल्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान झहीरला पुन्हा दुखापत झाली. यानंतर मात्र तो सातत्याने दुखापतीचा सामना करु लागला. परिणामी त्याला बऱ्याचदा संघाबाहेर रहावे लागले. या दुखापतींमुळे झहीरने 2012 नंतर वनडे सामने खेळले नाहीत. तसेच 2012 नंतर केवळ 3-4 कसोटी सामने तो खेळू शकला. अखेर 2015 मध्ये झहीरने निवृत्ती स्विकारली. जेव्हा झहीर निवृत्ती घेणार होता, तेव्हा त्याची आई देखील त्याच्या दुखापती पाहून म्हणाली होती, ‘खूप झाले आता बसं कर’.

झहीरकडे रिव्हर्स स्विंग, बाऊन्सर, नकल बॉल अशी अस्त्र होती. त्यात तो डावकरी वेगवान गोलंदाज असल्याने त्याचा भारताला मोठा फायदा झाला. झहीरने अनेकदा दुखापतीमुळे बाहेर राहुनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 610 विकेट्स घेतल्या. तो स्वत:तर चांगली गोलंदाजी करायचाच पण दुसऱ्यांना चांगले मार्गदर्शनही करायचा. त्याचे सल्ले अनेक खेळाडूंसाठी उपयोगी पडले होते. विराटने अनुष्कासोबतच्या प्रेमाची माहिती सर्वात पहिल्यांदाच झॅकलाच दिली होती. तसेच त्याकडून सल्लाही घेतला होता.  त्यामुळे खेळाडूंनी त्याला ज्ञानी बाबा असे नाव दिले होते. मुळातच हुशार असणाऱ्या झहीरने क्रिकेट कारकिर्दीनंतर काय याचा आधीच विचारही करुन ठेवला होता. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असतानाच हॉटेल व्यवसायात उतरला होता. ‘झेडके’ नावाने त्याचे पुण्यात हॉटेल आहे. त्याचबरोबर कारकिर्दीत सातत्याने दुखापतीमुळे त्रास सहन केलेल्या झहीरने बाकीच्यांना हा त्रास सहन करावे लागू नये म्हणून प्रोफिटनेस सर्व्हिस ही कंपनी देखील सुरु केली. झहीरने गोलंदाजी करताना उंच उडी घेत चेंडू टाकल्यावर फलंदाजाकडे जाणारी त्याची भेदक नजर आजही अनेकांच्या आठवणीत राहिल. ज्याज्यावेळी भारताच्या वेगवान गोलंदाजांबद्दल चर्चा होते तेव्हा झहीरची आठवण अनेकांना आल्याशिवाय रहात नाही.

-प्रणाली कोद्रे

याच लेखमालेतील अन्य लेख-

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला

एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग

-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!

गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या द्रविडने भारतीयांच्या मनात मात्र तो ऑनर मिळवलाच

क्रिकेटवरील “भारतीय क्रिकेटचे शापीत शिलेदार” लेखमालेतील काही खास लेख-

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १० – विस्मृतीत गेलेला अजय रात्रा

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ९ – तिसरा गोलंदाज

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ८ – आठवावा लागणारा निखिल चोप्रा

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले!

-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते!!

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर 

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---