पुणे। आजपासून(10 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात दुसरा कसोटी सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे सुरु झाला आहे. हा सामना भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी खास ठरला आहे.
हा विराटचा कर्णधार म्हणून 50 वा कसोटी सामना आहे. त्यामुळे तो 50 किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामन्यात नेतृत्व करणारा जगातील सोळावा, आशियातील चौथा आणि भारताचा केवळ दुसराच कर्णधार ठरला आहे.
याआधी भारताच्या केवळ एमएस धोनीने 50 पेक्षा अधिक कसोटी सामन्यात नेतृत्व केले आहे. धोनीने 60 कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. तसेच धोनी सर्वाधिक कसोटी सामन्यात नेतृत्व करणारा आशियाई कर्णधारही आहे.
भारताकडून सर्वाधिक कसोटी सामन्यात नेतृत्व करण्याच्या यादीत विराटने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. गांगुलीने 49 कसोटीत भारताचे नेतृत्व केले आहे.
विराटने आजपासून सुरु झालेल्या कसोटी सामन्याआधी कर्णधार म्हणून खेळलेल्या 49 कसोटी सामन्यांपैकी 29 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर 10 सामन्यात पराभव स्विकारला आणि आणि 10 सामने अनिर्णित राहिले आहेत.
आजपासून सुरु झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वाधिक कसोटी सामन्यात नेतृत्व करणारे भारतीय कर्णधार –
60 – एमएस धोनी
50* – विराट कोहली
49 – सौरव गांगुली
47 – मोहम्मद अझरुद्दीन
47 – सुनील गावस्कर
सर्वाधिक कसोटी सामन्यात नेतृत्व करणारे आशियाई कर्णधार –
60 – एमएस धोनी
56 – मिस्बाह उल हक
56 – अर्जूना रणतुंगा
50* – विराट कोहली