मुंबई । रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (आरसीबी) कर्णधार विराट कोहली संघासाठी एक आदर्श खेळाडू म्हणून ओळखला जातो. मात्र, आयपीएल 2020 च्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला आरसीबीसाठी काही खास करता आले नाही. पहिल्या सामन्यात संघाने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय मिळविला. परंतु विराट केवळ 14 धावांचे योगदान देऊ शकला, तर किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध त्याला फक्त एक धाव करता आली. याशिवाय त्याच्याकडून काही झेलही सुटले होते. अशा परिस्थितीत जेव्हा त्याच्यावर टीका केली जात होती, तेव्हा त्याचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी त्याचे समर्थन केले आहे.
विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “भारतीय संघाचा कर्णधार विराटने एक उदाहरण सेट केले आहे. लोकांनी इतक्या लवकर संयम गमावला आहे की, प्रत्येक वेळी तो फलंदाजीला उतरतो, तेव्हा लोक त्याच्याकडून धावांच्या अपेक्षा करतात. हा खेळाडूच्या आयुष्याचा एक भाग आहे. तुमच्याकडेही कधी चांगले दिवस असतात, तर कधी मैदानावर तुमचे वाईट दिवस असतात. शेवटी तो फक्त मनुष्य आहे आणि यंत्र नाही.”
ते पुढे म्हणाले, “लोक विचारतील की ही काही तांत्रिक समस्या आहे की मानसिकतेचा प्रश्न आहे. परंतु मी पुन्हा सांगेन की हा खेळाचा एक भाग आहे. कारण प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही सामना खेळण्यासाठी उतराल, तेव्हा आपण यशस्वी होऊ शकत नाही. विराटच्या चाहत्यांना त्याला सातत्याने कामगिरी करताना पाहण्याची सवय झाली आहे. त्याचा खराब डावदेखील लोकांना दु: खी करतो.” शेवटच्या सामन्यात विराटने झेल सोडला आणि कर्णधार केएल राहुलने एक मॅच विनिंग शतक ठोकले.
“सर्वप्रथम, मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे या गोष्टी घडतात. कोणीही एक किंवा दोन झेल सोडू शकतो. जॉन्टी रोड्सनेही झेल सोडले आहेत. जावेद मियांदाद एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मानले जात होते. पण आपण मागे वळून पाहिले, तर त्यांनीदेखील झेल सोडले आहेत. म्हणूनच तुम्ही त्याला मैदानावरील एक वाईट दिवस म्हणू शकता,” असेही राजकुमार शर्मा यांनी सांगितले.