भारतातील सर्वात मोठी फर्स्टक्लास क्रिकेट टूर्नामेंट असलेल्या रणजी ट्रॉफीचा ८७ वा सिझन झाला. कोरोनामूळे इतिहासात प्रथमच ही स्पर्धा वर्ष दोन वर्ष रद्द करावी लागलेली. मात्र, २०२२ मध्ये पुन्हा रणजी ट्रॉफीने आपली तीच ‘परंपरा प्रतिष्ठा आणि अनुशासन’ जपत भारतीय क्रिकेटला समृद्ध केले. फायनलमध्ये रणजी जायंट मुंबई आणि मध्य प्रदेश उभे ठाकलेले. फेवरेट मुंबईला मागे टाकत मध्य प्रदेशने पहिल्यांदा रणजी ट्रॉफी उंचावली. पूर्वी होळकर संस्थानाच्या नावाने खेळणाऱ्या मध्य प्रदेशने १९५२-१९५३ मध्ये आपली चौथी आणि अखेरची रणजी ट्रॉफी जिंकलेली. मध्य प्रदेश नावाने त्यांची ही पहिलीच ट्रॉफी.
मात्र, मध्य प्रदेशला हा सोन्याचा दिवस दाखवण्यात सर्वात मोठा वाटा एका मुंबईकराचा आहे. हा मुंबईकर ड्रेसिंग रूममध्ये बसून मुंबई विरोधातच रणनीती आखत होता. त्याची रणनीती सफल ठरली आणि मध्य प्रदेश रणजी चॅम्पियन बनली. हा मुंबईकर होता मध्य प्रदेशचे हेड कोच चंद्रकांत पंडित.
चंद्रकांत पंडित पक्के मुंबईकर. क्रिकेटचे धडे गिरवले शिवाजी पार्कात. गुरु साक्षात रमाकांत आचरेकर. सवंगडी सचिन तेंडुलकर, लालचंद राजपूत, प्रवीण आमरे. असलं भरभक्कम प्रोफाईल आणि टॅलेंट असल्यावर मुंबईसाठी रणजी खेळण्यात त्यांना कसलीच अडचण आली नाही. विकेटकिपर म्हणून करिअर करताना मुंबईपासून टीम इंडियापर्यंतचा प्रवास केला. टीम इंडियासाठी पाच टेस्ट आणि ३६ वनडे अस छोटास इंटरनॅशनल करियर. मात्र, २१ रणजी सीजनचा भक्कम अनुभवही त्यांच्या पाठीशी होता. खेळाडू म्हणून खेळताना मुंबईच्या चार रणजी ट्रॉफी विजयात सिंहाचा वाटा उचलला. मध्य प्रदेशसाठीही 23 वर्षांपूर्वी फायनल त्यांनी खेळली. तिथं मात्र ट्रॉफी उंचवायची राहीली. रिटायरमेंट घेतली आणि सेकंड इनिंग कोच म्हणून सुरू केली.
चंद्रकांत पंडितांनी ज्या दिवशी कोच बनायचा निर्णय घेतला असेल त्या दिवशी त्यांना स्वतःलाही वाटले नसेल की, काही वर्षातच आपण भारतातील सर्वात महागडे आणि सर्वात यशस्वी कोच बनू. महाराष्ट्र आणि केरळ असा प्रवास करत मुंबईचा कोच म्हणून त्यांची निवड झाली. या काळात चंद्रकांत पंडित यांची कोचिंग स्टाईल देशभरात चर्चिली जाऊ लागलेली. टास्क मास्टर म्हणून त्यांची ओळख झाली. पुढे राजस्थानने त्यांना डायरेक्टर ऑफ क्रिकेट बनवलं आणि राजस्थान सलग दोनदा रणजी ट्रॉफी जिंकली. चंद्रकांत पंडितांचा लोहा सारे जण मानू लागलेले. मुंबईने त्यांना पुन्हा बोलावलं आणि मुंबई चॅम्पियन बनली. पुढची दोन वर्ष रणजी ट्रॉफी कर्नाटकच्या नावे राहिली. २०१५-२०१६ ला पुन्हा रणजी ट्रॉफी मुंबईकडेच. पुढच्या सीजनला मुंबई फायनलमध्ये.
मुंबईची साथ सोडल्यावर त्यांनी विदर्भाचा हात धरला आणि पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला सलग दोन वर्ष विदर्भाला रणजी ट्रॉफी विजेते होण्याचा मान मिळवून दिला. मधल्या काळात इंडिया अंडर नाईन्टीन कोच आणि सिलेक्टर म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
एवढा कामाचा माणूस म्हटल्यावर त्याला सगळीकडे मागणी असणारच. २०२० मध्ये मध्य प्रदेशने तब्बल दीड कोटी वार्षिक पॅकेज देत त्यांना करारबद्ध केलं. ध्येय एकच रणजी ट्रॉफी. पहिला सीजन ग्रुप स्टेजमध्ये आटोपला. मात्र रिझल्ट द्यायचे आव्हान त्यांच्यापुढे होतेच. दोन वर्षातील ४०५ दिवस जवळपास १५० खेळाडूंवर ते लक्ष देवून होते. एज ग्रुप क्रिकेट, महिला क्रिकेट आणि सिनियर क्रिकेटर्स साऱ्यांवर त्यांची घारीसारखी नजर होती. असोसिएशनने कोणाच्या नावाची शिफारस केली तर, थेट राजीनामा देण्याची धमकी त्यांनी दिली. एखादा खेळाडू टॅलेंटेड वाटला की त्याला कॅम्पमध्ये आणले. शिस्त आणि शिस्त ही एकच सवय त्यांनी सर्वांना लावली.
सीनियर खेळाडूंना भैय्या म्हणायची पद्धत त्यांनी सर्वात पहिल्यांदा बंद केले. जे काही असेल ते नावाने बोलायचे. इतकच काय कधी कधी रात्री बारा वाजताही खेळाडूंना ग्राउंडवर बोलाविण्यात ते मागेपुढे पाहत नव्हते. महुच्या आर्मी कॅम्पमध्ये जाऊन मेंटली टफ होण्यासाठी त्यांनी खेळाडूंना ट्रेनिंग दिले. याचंच फळ आज मिळतंय. ज्या मध्य प्रदेशसोबत २३ वर्षापूर्वी खेळाडू म्हणून रणजी ट्रॉफी उंचवायची हुकलेली संधी, त्यांनी यावेळी कोच म्हणून साधलीये.
एकेकाळी चंद्रकांत पंडितांचा सहकारी आणि नंतर शिष्य राहिलेला वासिम जाफर त्यांच्या यशाचे गमक सांगताना म्हणतो,
“चंदू कभी प्यार से समजता है कभी डाट के”
आज देशभरात चंदू सर म्हणून आपलं आदरयुक्त स्थान बनवलेल्या चंद्रकांत पंडितांना, लवकरच इंटरनॅशनल लेव्हलवर एखाद्या टीमने कोचिंगची संधी दिल्यास कोणाला बिलकुल आश्चर्य वाटायला नको.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
विंडीजविरुद्ध गब्बरला कर्णधार करुन बीसीसीआयने दाखवला ५ कर्णधारांना बाहेरचा रस्ता?
पहिल्या ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यासाठी अशी बनवा ड्रीम ११, ‘या’ फलंदाजांना द्या संधी
रिक्षाचालकाचा मुलगा, ज्याने कर्नाटकच्या फास्ट बॉलिंगची परंपरा नेली पुढे