कोणत्याही क्रिकेट संघात एका स्थानासाठी दोन क्रिकेटपटूंमध्ये स्पर्धा होणे साहजिक असते. भारतीय यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि रिषभ पंत यांच्यातील तुलनेचे सत्र तर फार वर्षांपासून चालू आहे. पंतच्या प्रवेशानंतर साहाचे भारतीय कसोटी संघातील स्थान धोक्यात आल्याप्रमाणे झाले आहे. एकेकाळी भारतीय संघाचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक असलेल्या साहाची संघात निवड तर होते, परंतु त्याला अंतिम ११ जणांमध्ये फार कमीवेळा जागा मिळते.
जून महिन्यात होणारा विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि त्यापुढील भारत-इंग्लंड कसोटी मालिका यासाठी साहा आणि पंत या दोघांचीही निवड करण्यात आली आहे. या मोठ्या दौऱ्यापुर्वी साहाने संघातील यष्टीरक्षक फलंदाजाच्या जागेबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोण भारतीय संघाचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक असावा?, याचे उत्तर त्याने दिले आहे. स्पोर्ट्सकीडाशी साहा बोलत होता. तो म्हणाला की, “पंतने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील शेवटचे काही सामने खेळले आहेत. त्याने खरोखरच चांगले प्रदर्शन केले आहे. तोच इंग्लंड दौऱ्यावर पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक फलंदाज असावा.”
“असे असले तरीही, मी शेवटपर्यंत वाट पाहणार आहे. जर मला संधी मिळाली तर मी माझे सर्वश्रेष्ठ देईन. मी यासाठी सराव करत राहीन. मी जरी मागील काही काळापासून सातत्याने प्रतिस्पर्धी क्रिकेट खेळलेले नाही, तरीही मला माझ्या प्रदर्शनात कसलाही बदल जाणवत नाही. माझ्या आजूबाजूच्या लोकांना माझ्या प्रदर्शनात बदल जाणवत असतील. पण मी चांगली कामगिरी करण्यात्या प्रयत्नात असेल. सराव सत्र आणि प्रत्यक्षात सामन्यात क्रिकेट खेळणे यामध्ये मोठे अंतर आहे. परंतु मी नेहमीच माझ्या प्रदर्शनात सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असेन,” असे त्याने पुढे म्हटले.
वृद्धिमान साहाची कसोटी कारकिर्द
साहाच्या कसोटी कारकिर्दीविषयी बोलायचे झाले तर, फेब्रुवारी २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध त्याने कसोटी पदार्पण केले होते. परंतु आजवर भारताकडून त्याला फक्त ३८ कसोटी सामने खेळायची संधी मिळाली आहे. दरम्यान ३ शतकांच्या मदतीने त्याने १२५१ धावा केल्या आहेत. सोबतच ७२ डावात यष्टीरक्षण करताना १०३ विकेट्स घेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत टॉप-५ मध्ये स्थान मिळवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट आणि रोहितमध्ये खरोखरच वाद आहे का? स्वतः रोहितच्या बालपणीच्या प्रशिक्षकांनी दिले उत्तर
सचिन तेंडुलकरने प्रचंड वेदनेत असून देखील खेळली होती ‘ती’ सिरीज, रॉबिन उथप्पाने केला खुलासा