आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यासाठी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता. तब्बल दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान, साउथम्प्टनच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे बलाढ्य संघ आमने सामने असणार आहेत. तत्पूर्वी, चेतेश्वर पुजारा विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनाबाबत प्रश्न विचारण्यात आले, ज्यावर त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
चेतेश्वर पुजाराने मंगळवारी (१५ जून) एका ऑनलाईन चर्चा सत्रात सहभाग घेतला होता. त्यामध्ये त्याला एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील २००७ मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धा विजयाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तो म्हणाला, “हो. नक्कीच मला असे वाटते की, कसोटी क्रिकेट जिवंत राहणे गरजेचे आहे. यामध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा मोलाची भुमिका बजावणार. जर आम्ही ही स्पर्धा जिंकलो, तर भारतात कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या युवा खेळाडूंच्या संख्येत वाढ होऊ शकते.” टी -२० विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर युवा खेळाडू टी-२० क्रिकेटकडे जास्त आकर्षित झाले होते.
तसेच तो पुढे म्हणाला की, “भारतातच नव्हे तर जगभरात ही, कसोटी क्रिकेट जिवंत ठेवण्याची आवश्यकता आहे. असे करण्यास विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा मोलाची भुमिका बजावणार आहे. व्यक्तिगतरित्या ही दोन वर्षांची मेहनत आहे. आम्ही विजयाच्या अगदी जवळ आहोत. त्यातही माझ्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे कारण मी फक्त कसोटी क्रिकेट खेळतो.”
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा विश्वचषकासारखीच
“हे पहिल्यांदाच आहे जेव्हा आम्ही विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळत आहोत. एक संघ म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तुम्हाला इथे पोहोचण्यासाठी मायदेशात आणि परदेशात जाऊन मालिका जिंकायच्या असतात. या खेळात सर्वोच्च स्थानी टिकून राहण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. हे काही विश्वचषक स्पर्धेपेक्षा कमी नाहीये. कसोटी क्रिकेटमध्ये हे पहिल्यांदा आहे. परंतु हे वनडे आणि टी-२० क्रिकेट विश्वचषक खेळण्यासारखेच आहे. एक संघ म्हणून आम्ही अंतिम सामन्याची वाट पाहत आहोत,” असे तो पुढे म्हणाला. (WTC will help test cricket to keep alive)
भारतीय गोलंदाजांचे केले कौतुक
पुजाराने संघातील गोलंदाजांचे कौतुक केले आहे. त्याने जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा आणि उमेश यादवचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्याने म्हटले की, “आम्ही आमच्या गोलंदाजीमुळेच अंतिम फेरी गाठली आहे. त्यांना २० गडी बाद करण्यात यश आले आहे. त्यांनी आमच्यासाठी इतके कसोटी सामने जिंकले आहेत. आता अंतिम सामन्याच्या आव्हनासाठी देखील ते तयार आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘हा’ खेळाडू भारताचा ठरेल एक्स फॅक्टर, एका तासात जिंकवेल सामना; बड्या फलंदाजांचा दावा
‘या’ युवा शिलेदारात मला रोहितची छबी दिसते, पाकिस्तानी क्रिकेटरकडून तोंडभरुन कौतुक
टेस्ट चॅम्पियनशीपचा विजेता एका नव्हे ३ सामन्यांद्वारे ठरवा, शास्त्रींच्या मागणीवर आयसीसीचे आले उत्तर