भारतीय संघाने २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. या दौऱ्यातील गाबा येथे झालेला चौथा आणि शेवटचा कसोटी सामना भारतीय संघासाठी अविस्मरणीय ठरला होता. या सामन्यात भारतीय संघाने ३२७ धावांचा पाठलाग करताना ऐतिहासिक विजय मिळवला होता. चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांच्या खेळीने भारतीय संघासाठी हे भलेमोठे लक्ष्य पार करणे अगदी सोपे बनवले होते. या खेळाच्या आठवणीला उजाळा देत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मार्कस हॅरीस याने मोठे वक्तव्य केले आहे.
गाबा कसोटीचा शेवटचा दिवस अतिशय शानदार राहिल्याचे हॅरीसने सांगितले आहे. भारतीय संघाने ज्याप्रकारे ऑस्ट्रेलियाच्या लक्ष्याचा पाठलाग केला, ते पाहता या सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत अधिक चांगला खेळला असल्याचे हॅरिसचे म्हणणे आहे.
तो म्हणाला की, “गाबा कसोटीच्या शेवटच्या दिवशी खेळायला खूप मजा आली होती. आम्ही तर तो पूर्ण दिवस भारतीय संघ धावा करु शकेल की नाही? याच्याच विचारात होतो. मला वाटते की, पंतने त्यादिवशी त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी केली होती. परंतु पुजारा ज्याप्रकारे त्या सामन्यात मैदानावर स्थिरावला, ते अतिशय कौतुकास्पद होते. त्याला पाहून असे वाटत होते की, तो एका ऑस्ट्रेलियन फलंदाजाप्रमाणे खेळत होता. तो एकटा सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत डाव पुढे नेत होता. उर्वरित संघानेही त्याला साथ दिली होती.”
रिषभ पंतचे कौतुक करताना हॅरिस म्हणाला की, “पंतची ती खेळी अविश्वसनीय होती. प्रत्येकजण म्हणतो की पंतमध्ये एक प्रकारची जादू आहे आणि खूप कमी काळात पंतने हे पूर्ण जगाला दाखवून दिले आहे. आम्ही ती कसोटी मालिका गमावणे फार दुर्दैवी होते. परंतु क्रिकेटमध्ये कधीकधी असे होत असते.”
गाबा कसोटीच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या ३२७ धावांचा पाठलाग करताना पंतने १३८ चेंडूत नाबाद ८९ धावांची धमाकेदार खेळी केली होती. कसोटीपटू चेतेश्वर पुजारानेही २११ चेंडूंचा सामना करताना ५६ धावांचे योगदान दिले होते.