बांगलादेश विरूद्ध वेस्ट इंडिजच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चटगावच्या मैदानावर खेळविण्यात येत आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशाचा कर्णधार मोमिनुल हक याने शानदार शतक झळकावत आपल्या संघाला सामन्यात भक्कम स्थितीत आणले. बांगलादेशने आपला दुसरा डाव ८ बाद २२३ धावांवर घोषित केला. वेस्ट इंडीजला या सामन्यात विजयासाठी ३९५ धावांचे मोठे लक्ष्य पार करावे लागणार आहे.
मोमिनुलने झळकावले दमदार शतक
पहिल्या डावात मिळालेल्या १७१ धावांच्या आघाडीनंतर दुसऱ्या डावात बांगलादेशची सुरुवात अत्यंत खराब झाली. बांगलादेशने आपले आघाडीचे तीन फलंदाज अवघ्या ३३ धावांवर गमावले होते. त्यानंतर मोमिनुल हक व अनुभवी मुशफिकूर रहिम यांनी थोडाफार प्रतिकार केला. मात्र, रहिम वैयक्तिक १८ धावा काढून तंबूत परतला. यष्टीरक्षक लिटन दासला साथीला घेत मोमिनुलने बांगलादेशचा डाव सावरला. दोघांनी पाचव्या गड्यासाठी १३३ धावांची भागीदारी केली. दरम्यान मोमिनुलने आपले शतक पूर्ण केले. अखेरीस कर्णधाराने २२३ धावांवर डाव घोषित केला. वेस्ट इंडीजकडून कॉर्नवॉल व वॅरीकेन यांनी प्रत्येकी तीन बळी मिळविले.
बांगलादेशला मिळाली होती आघाडी
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अष्टपैलू मेहदी हसनच्या शतकाच्या व शकीब अल हसन आणि शदमन इस्लाम यांच्या अर्धशतकाच्या जोरावर ४३० धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात, फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडीज संघाला मेहदी हसनच्या गोलंदाजीपुढे शरणागती पत्करावी लागली व त्यांचा डाव २५९ धावांवर संपुष्टात आला. त्याने ४ गडी बाद केले. वेस्ट इंडीजसाठी कर्णधार क्रेग ब्रेथवेटने सर्वाधिक ७६ धावा बनवल्या.
वेस्ट इंडीजची खराब सुरुवात
बांगलादेशने दिलेल्या ३९५ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजची सुरुवात खराब झाली. वेस्ट इंडीजने ५९ धावांवरच कर्णधार क्रेग ब्रेथवेट, कॅम्पबेल व मोसले यांचे बळी गमावले होते. मात्र त्यानंतर कायले मायर्स व निक्रूमाह बोनर यांनी डाव सावरला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा बोनर १५ तर मायर्स ३७ धावांवर नाबाद आहेत. शेवटच्या दिवशी पाहुण्याल संघाला विजयासाठी अजून २८५ धावांची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या:
दु:खद! पदार्पणाच्या कसोटीत शतक आणि ५ विकेट्स घेणाऱ्या एकमेव क्रिकेटपटूचे निधन
सिराज-कुलदीपमध्ये झाली हमरातुमरी?, व्हिडिओ होतोय व्हायरल
भारताच्या संघव्यवस्थापनाची पहिल्या कसोटीसाठी हास्यास्पद संघनिवड, या दिग्गजाची टीका