आयपीएलच्या १३ व्या हंगामातील सर्व सामन्यांचे आयोजन मुंबईत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआय आयपीएलचे आयोजन करण्यासाठी दुबई किंवा श्रीलंकेव्यतिरिक्त बेंगळुरू, मोहाली, जयपूर आणि हैद्राबादमध्येही पर्याय शोधत आहे.
असे असले तरीही एका सूत्राने स्पोर्ट्सकीडाला सांगितले, की कोरोना व्हायरसची (Corona Virus) सर्वाधिक प्रकरणे असूनही मुंबई हे या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.
बीसीसीआयने (BCCI) मुंबईमध्ये ३ स्टेडियम निवडले आहेत. त्यामध्ये वानखेडे स्टेडियम, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे ब्रेबाॅर्न स्टेडियम आणि डी.वाय. पाटील स्टेडियम या ३ स्टेडियमला पर्याय म्हणून ठेवले आहे. यापूर्वी बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन करण्यासाठी २६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर एक तात्पुरती तारीख जाहीर केली होती. बोर्डाने या तारखांची घोषणा करण्यापूर्वी ऑक्टोबरमध्ये टी२० विश्वचषकाचे आयोजन होणार नाही, असा विश्वास होता.
आयपीएलच्या आयोजनासाठी मुंबईचं बीसीसीआयची पहिली पसंत
याव्यतिरिक्त बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) सर्व बोर्डांच्या सदस्यांना पत्र लिहून प्रेक्षकांविना सामन्यांचे आयोजन करण्याची तयारी करण्यास सांगितले होते. मुंबई हे असे शहर आहे, जिथे आयपीएल फ्रंचायझींना हॉटेल मिळू शकते. त्यामुळे खेळाडूंचा प्रवासाचा वेळ वाचू शकतो. त्यामुळे मुंबईमध्ये आयपीएलचे आयोजन होण्याची दाट शक्यता आहे.
एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “सध्या मुंबई (Mumbai) बीसीसीआयसाठी निश्चितच पहिली पसंत आहे. येथून गोष्टी कशा पुढे जातात ते पाहू.”
यावेळी कोणताही संघ आपल्या घरच्या मैदानावर सामन्यांचे आयोजन करू शकणार नाही. अशामध्ये आयपीएलचे आयोजन करणाऱ्या राज्यांना यावेळी ३.५ कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.
एका सूत्राने सांगितले, “राज्य असोसिएशनला चिंता करण्याची काही गरज नाही. कारण बीसीसीआयची आयपीएलमधून जी काही कमाई होईल, ती असोसिएशन्सला मिळणार आहे.”
आयपीएल आयोजित करण्यासाठी सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे बीसीसीआय कठोरपणे अंमलबजावणी करेल.