बेंगलोर। रविवारी (21 एप्रिल) एम चिन्नास्वामी स्टेडीयमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल 2019 चा 39 वा सामना पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात बेंगलोरने 1 धावेने विजय मिळवला.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी 1 चेंडूत 2 धावेची गरज होती. यावेळी या सामन्यात 48 चेंडूत 5 चौकार आणि 7 षटकारांची आतिषबाजी करत नाबाद 84 धावांची खेळी करणारा चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी फलंदाजी करत होता. त्यामुळे सर्वांनाच तो चेन्नईला सामना जिंकून देईल असे वाटले होते.
परंतू उमेश यादवने टाकलेला स्लोअर ऑफ कटर या शेवटच्या चेंडूवर धोनीचा फटका हुकला आणि चेंडू यष्टीरक्षक पार्थिव पटेलकडे गेला. तरीही धोनीने एकेरी धाव चोरण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या बाजूला असणारा दीपक चहर वेळेत क्रिजमध्ये पोहचण्याआधीच पार्थिवने चेंडू थेट स्पंम्पवर मारला. त्यामुळे चहर धावबाद झाला आणि चेन्नईला 1 धावेने सामना गमवावा लागला.
याबद्दल बोलताना पार्थिव म्हणाला, त्याने अपेक्षा केली नव्हती की धोनीचा फटका हुकेल.
सामन्यानंतर पार्थिव म्हणाला, ‘आम्हाला प्रमाणिकपणे वाटत होते की त्याने मैदानाच्या ऑफ साईडला फटका मारायला हवा. जर त्याने लेग साईडला फटका मारला असता तर तिथे दोन धावा त्याने काढल्या असत्या. कारण मला वाटत नाही तो ज्याप्रकारे धावतो ते पाहुन त्याला दोन धावा काढण्यापासून कोणी रोखू शकले असतो.’
‘त्यामुळे आम्ही उमेशला ऑफ स्टंम्पच्या आउटसाईडला स्लोअर बॉल टाकायला सांगितले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे धोनी फटका मारण्यास हुकला. मी आपेक्षा केली नव्हती की तो हुकेल पण तो फटका मारण्यास हुकला.’
त्याचबरोबर पार्थिव म्हणाला, ‘बेंगलोर किंवा मुंबई अशा ठिकाणी शेवटच्या पाच षटकात 70 धावा करणे शक्य आहे. त्यामुळे तुमच्याकडे समोरच्याला रोखण्यासाठी 80-90 धावा हव्या असतात. त्यामुळे आम्ही धोनीला बाद करण्याचा प्रयत्न करत होतो.’
‘आम्ही जेवढे शक्य आहे तेवढे निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत होतो आणि दुसऱ्या फलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होतो. कारण आम्हाला सर्वांना माहित आहे धोनी कसा आहे. तो शेवटच्या तीन ते चार षटकांपर्यंत सामना घेऊन जातो आणि बऱ्याचदा सामना जिंकतो.’
या सामन्यात पार्थिवने धावबाद बरोबरच फलंदाजी करतानाही शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याने 37 चेंडूत 53 धावा केल्या. यात त्याने 4 षटकार आणि 2 चौकार मारले. त्याच्या या अर्धशतकाच्या जोरावर बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 161 धावा करता आल्या. पार्थिवच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या –
–…म्हणून एमएस धोनीने काढल्या नाही त्या एकेरी धावा
–२०१९ विश्वचषकासाठी असा आहे १५ जणांचा अफगाणिस्तान संघ
–एमएस धोनी आयपीएलमध्ये ही खास ‘डबल सेंच्यूरी’ करणारा पहिला भारतीय