भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकर गेले २ वर्षे भारतीय संघातून बाहेर आहे. तो भारताकडून अखेरचे २०१९ साली झालेल्या विश्वचषकात खेळला होता. त्यावेळी त्याला भारतीय संघात स्थान मिळाल्याने खूप चर्चा झाली होती, मात्र तो ही स्पर्धा सुरु असताना दुखापतग्रस्त झाला आणि स्पर्धेतून बाहेर गेला. या स्पर्धेनंतर त्याला अजूनपर्यंत एकदाही भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. सध्या तो त्याच्या विविध वक्तव्यांमुळे पुन्हा चर्चेत आला आहे.
त्याने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की तो भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर त्याने असेही सांगितले की त्याने तमिळनाडू संघ सोडण्याचा विचार केला होता.
याबद्दल तो म्हणाला, ‘मी या विषयावर कोणाशी चर्चा केलेली नाही तमिळनाडू संघ आणि त्यांच्या संघव्यवस्थापनाशीही माझी चर्चा झालेली नाही. पण एक वर्षांपूर्वी नक्कीच माझ्या मनात दुसऱ्या राज्यात जाण्याचा विचार आला होता. कारण मी वेगवेगळ्या फलंदाजी क्रमांकावर खेळत होतो. एक क्रिकेटपटू म्हणून मला कामगिरी करत राहाणे गरजेचे आहे. जर मी धावा केल्या, तर लोक मला पाहातील.’ शंकरने हे न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखातीत सांगितले.
तसेच शंकर असेही म्हणाला की ‘देशांतर्गत क्रिकेट किंवा आयपीएलकडे तुम्ही पाहिले तर मी वेगवेगळ्या क्रमांकांवर फलंदाजी केली आहे. बहुतेकवेळा मी ६ व्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. अशावेळी माझ्याकडे बहुतेक सामन्यांमध्ये फलंदाजी करण्यासाठी खूप षटके शिल्लक नसतात. मी अशा परिस्थितीत अशा स्थितीत पोहचलो आहे की मी फक्त ३०-४० धावा करणारा फलंदाज बनून राहिलो आहे. मला वाटत नाही की अशा कामगिरीमुळे मी भारतीय संघात स्थान मिळवू शकेल.’
त्याचबरोबर तो पुढे म्हणाला, ‘मी असे म्हणत नाही की मला सलामीला पाठवा. पण जर मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये ४ किंवा ५ व्या क्रमांकावर फलंदाजी करत असेल आणि तरी मी धावा करत नसेल, तर मला संघातून बाहेर केले पाहिजे. त्यानंतर मला वाईट वाटणार नाही. मी एक अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. पण माझी ओळख माझी फलंदाजी आहे.’
‘मी केवळ एक अष्टपैलू आहे ,म्हणून ६ किंवा ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करणे योग्य नाही. मी जॅक कॅलिस किंवा शेन वॉटसनसारखा बनू शकतो. त्यांनी संघाला सुरुवात करुन देण्याबरोबरच तिसऱ्या क्रमांकावरही फलंदाजी केली आहे. कोणत्याही अष्टपैलू खेळाडूने ६ किंवा ७ व्या क्रमांकावरच फलंदाजी करणे आवश्यक नसते. जर मी वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन धावा करत असेल आणि विकेटही घेत असेल तर माझ्या संघासाठी हे फायद्याचेच आहे.’
विजय शंकर २ वर्षांपूर्वी त्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर गेला होता. तसेच नंतर भारतीय संघात हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा हे अष्टपैलू खेळाडू असल्याने शंकरला संधी मिळाली नाही. तसेच शंकरकडूनही फारशी चांगली कामगिरीही झाली नाही.
शंकरची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
शंकरने आत्तापर्यंत भारतीय संघाकडून १८ जानेवाीरी २०१८ ला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने १२ वनडे सामने खेळले. यात त्याने २२३ धावा केल्या आणि ४ विकेट्स घेतल्या. तसेच त्याने २०१८ सालीच मे महिन्यात श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने ९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना १०१ धावा केल्या आणि ५ विकेट्स घेतल्या.
तो भारताकडून शेवटचा सामना २०१९ च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध मँचेस्टर येथे खेळला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘नॅशनल क्रश’ रश्मिका विराट-रोहित नव्हे ‘या’ क्रिकेटपटूची आहे जबराट फॅन, नाव आहे तुमच्याही ओळखीचं
पहिल्याच भेटीत विराटने सचिनच्या पायाशी घातले होते लोटांगण, ‘मास्टर ब्लास्टर’ही गेला होता गोंधळून