भारतीय संघाचे फिरकीपटू कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल म्हणजेच ‘कुल-चा’ जवळजवळ दोन वर्षानंतर मैदानावर पुन्हा एकदा एकत्र उतरले होते. या दोन्ही खेळाडूंना श्रीलंकाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये खेळणाऱ्या 11 खेळाडूंमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते. कुलदीप आणि चहल या जोडीला कर्णधार शिखर धवन आणि संघ व्यवस्थापक घेतलेल्या निर्णयामुळे स्वतःला सिद्ध करता आले. या दोघांनीही श्रीलंका संघाचे 4 गडी बाद करण्यात यश मिळवले आणि श्रीलंका संघाच्या वेगाने वाढणाऱ्या धावांवर अंकुश लावला.
या दोघांनाही एकत्र गोलंदाजी करताना पाहून भारताच्या 2018 मधील दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या आठवणी ताज्या झाल्या. या दौऱ्यादरम्यान कुलदीपने 6 सामन्यांमध्ये 17 बळी तर चहलने 6 सामन्यात 16 बळी घेतले होते. या दोघांनीही श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये अशीच आपली गोलंदाजीतील चमक दाखवत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
मला चहल बरोबर खूपच चांगले वाटतं
या सामन्यानंतर कुलदीप म्हणाला की, “बर्याच दिवसानंतर चहल आणि मी भारतासाठी एकत्र खेळलो याचा मला खूप आनंद झाला आहे. आम्हाला एकमेकांशी सोबत खूप चांगले वाटते आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आम्ही मैदानावर एकमेकांशी माहिती शेअर करत असतो. आमच्यातील नाते खूप घट्ट आहे. खूप दिवसानंतर आम्ही दोघेही एकत्र खेळलो आणि त्याचा निकाल देखील चांगलाच मिळाला. त्याचबरोबर यामुळे संघाला विजयी होण्यास खूप मदत मिळाली.”
आम्ही फक्त आमच्या कामगिरीचा आनंद घेण्यासाठी आलो होतो
कुलदीप पुढे म्हणाला की, “आम्ही जेव्हा गोलंदाजी करत होतो. त्यावेळी खेळपट्टी खूपच कोरडी होती आणि या कारणामुळे मी सतत चेंडूचा वेग बदलत होतो. मी फलंदाजाच्या खेळीनुसार माझा वेग बदलत होतो. खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळत होती.”
त्याचबरोबर कुलदीप पुढे म्हणाला की, “आम्ही येथे क्रिकेट खेळायला आलो आहोत. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आम्हाला क्रिकेट खेळण्याची संधी मिळत आहे. संघात अनेक तरुण खेळाडूही आहेत. अशा परिस्थितीत लोक काय म्हणत आहेत याची आम्हाला चिंता नाही. आम्ही फक्त खेळाचा आनंद घेण्यासाठी आलो आहोत.”
द्रविड सरांनी माझी आत्मविश्वास वाढला
तू या सामन्याबद्दल नर्वस होतास का? या प्रश्नाचे उत्तर देत कुलदीप यादव म्हणाला की, “जेव्हाही आपण मैदानावर येतो तेव्हा साहजिकच आहे की थोडीशी भीती वाटत असते. परंतु राहुल सरांनी मला प्रोत्साहन दिले आणि मला खूप मदत केली. आम्ही सामन्यापुर्वी खूप वेळ चर्चा केली होती. सरांनी मला इतकचं सांगितले की, तू फक्त गोलंदाजीचा आनंद घे आणि निकालाबद्दल जास्त विचार करू नकोस. मी माझ्या कामगिरीबद्दल खूप खूष आहे. एवढ्या कालावधीनंतर जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता तेव्हा तुमच्या मनात थोडी अस्वस्थता असते. जेव्हा आपण खेळत नाही, तेव्हा शंका येत राहते. पण हा एक खेळ आहे आणि या खेळामध्ये एखाद्याला संधी मिळते तर एखाद्याला मिळत नाही.”
‘कुल-चा’ जोडीने 19 षटकांत गोलंदाजी केली
पहिल्या एकदिवसीय सामन्यात कुलदीप-चहल जोडीने 19 षटकांत 100 धावा देत 4 गडी बाद केले. श्रीलंकेला 50 षटकांत केवळ 263 धावा करता आल्या. प्रत्युत्तर देत भारतीय संघाने 80 चेंडू शिल्लक ठेवत 7 गडी राखून सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकाच काय, तर भारताचा ब संघ इंग्लंडलाही हरवेल; ‘त्या’ टिकाकाराला सेहवागची सणसणीत चपराक
महागुरु द्रविडचे मार्गदर्शन लाभलंय, मग चांगल्या फॉर्ममध्ये तर येणारच; पाहा कोण म्हणालं असं
बड्डेदिवशी मुलगा ईशानचे वनडेत अविस्मरणीय पदार्पण, वडिलांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया