इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाचा (IPL 2022) लिलाव नुकताच बंगळुरू येथे पार पडला. १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी झालेला हा लिलाव मेगा लिलाव असल्याने सर्वच संघ जवळपास नव्याने बांधले गेले आहेत. त्यामुळे आता सर्वांना आयपीएलच्या या १५ व्या हंगामाची उत्सुकता लागली आहे. त्यातच आता अशीही चर्चा होत आहे की, या हंगामातील साखळी फेरीचे सामने महाराष्ट्रात म्हणजेच मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी होणार आहेत.
क्रिकेटबझने दिलेल्या वृत्तानुसार साखळी फेरीतील ५५ सामने मुंबईत खेळवले जातील. हे ५५ सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील अशा तीन वेगवेगळ्या स्टेडियमवर खेळवले जातील. त्याचबरोबर साखळी फेरीचे १५ सामने पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियवर खेळवले जातील.
तसेच अशीही माहिती मिळत आहे की, सर्व संघ साखळी फेरीतील प्रत्येकी ४ सामने वानखेडे स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर खेळतील, तर प्रत्येकी ३ सामने ब्रेबॉर्न स्टेडियम आणि गहुंजे येथे खेळतील.
त्याचबरोबर प्लेऑफच्या सामन्यांसाठी ठिकाण निश्चित झालेले नाही. पण हे सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होण्याची दाट शक्यता आहे.
खरंतर गेले दोन वर्षे कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचे सामने भारताबाहेर हलवावे लागले होते. २०२० आयपीएल हंगामाचा पूर्ण हंगाम संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) झाला होता. तसेच आयपीएल २०२१ हंगामातील पहिले सत्र भारतात झाले होते. मात्र, अचानक कोरोना व्हायरसचा धोका वाढल्याने दुसरे सत्र युएईमध्ये आयोजित करण्यात आले होते. त्याचमुळे बासीसीआयला यंदा कोणतीही जोखीम घ्यायची नसल्याची चर्चा आहे. त्याचमुळे विमानप्रवासाचा धोका टाळण्यासाठी साखळी फेरीचे सर्व सामने महाराष्ट्रात घेतले जाण्याचीच शक्यता आहे.
दरम्यान, अजूनतरी बीसीसीआयकडून अधिकृत माहिती समोर आली नसली, तरी २४ फेब्रुवारी रोजी आयपीएल गव्हर्निंग काउंन्सिलची बैठक होणार आहे. या बैठकीदरम्यान आयपीएल २०२२ हंगामाबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे (IPL 2022 league games to be played in Mumbai and Pune).
त्याचबरोबर हा हंगाम २६ किंवा २७ मार्च रोजी सुरू होऊ शकतो, तर अंतिम सामना २९ मे रोजी खेळवला जाण्याची शक्यता आहे.
आयपीएल २०२२ साठी २०४ खेळाडूंवर लागली बोली
बंगळुरूमध्ये १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी झालेल्या आयपीएल २०२२ हंगामासाठीच्या लिलावात २०४ खेळाडूंवर बोली लागली आहे. तसेच त्याआधी एकूण १० संघांनी मिळून ३३ खेळाडूंना संघात कायम केले होते. यंदाच्या आयपीएल हंगामापासून आठ जुन्या संघांसह गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स हे दोन नवे संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे साखळी फेरीतील सामन्यांची संख्या वाढली आहे. साखळी फेरीत एकूण ७० सामने होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आनंदही आनंद गडे! ३ महिन्यांनंतर अष्टपैलू जडेजाचे भारतीय संघात पुनरागमन, टी२० मालिकेसाठी आहे उत्साहित