सध्या यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४ व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. आयपीएल सुरू होण्याला आता एका महिन्यापेक्षाही कमी कालावधी उरला आहे. अशात आयपीएलबाबत सर्व चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. अनेक खेळाडूंनी उर्वरित आयपीएलमधून आपले नाव मागे घेतले आहे. त्यातच आता एक नवीन नाव समोर आले आहे. ते म्हणजे राजस्थान रॉयल्सचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर.
बटलरने यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएलपूर्वी घरगुती कारण देत आपले नाव मागे घेतले आहे. बटलर आता दुसऱ्यांदा बाप होणार आहे. अशावेळी त्याला त्याच्या पत्नीसोबत आणि परिवारासोबत वेळ घालवायचा असल्याकारणाने त्याने आयपीएल मधून नाव मागे घेतले.
यापूर्वीच राजस्थान रॉयल्सच्या संघातील २ इंग्लिश खेळाडूंनी दुखापतीमुळे नाव मागे घेतले होते. त्यात आता बटलरने देखील नाव मागे घेतल्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच बटलरबाबत आणखी एक माहिती समोर आली बटलरच्या मते तो ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या ऍशेस मालिकेतून देखील आपले नाव मागे घेऊ शकतो.
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून नाव मागे घेतल्यानंतर ‘द टाइम्स न्यूज पेपर’ सोबत याबाबत चर्चा करताना बटलर म्हणाला, “माझ्यासमोर सर्वात मोठे आव्हान हे आहे, की मला अशा ठिकाणी काम करायचे आहे, ज्याला मी नाकारू शकत नाही. यात मी म्हणू शकत नाही की मी हे काम करू शकत नाही. मी क्रिकेटसाठी खुप त्याग केले आहेत. त्याचबरोबर माझ्या पत्नीने आणि परिवाराने देखील खूप त्याग केला आहे.”
इंग्लंड संघाला ऑस्ट्रेलिया सोबत ऍशेस कसोटी मालिका खेळण्यापूर्वी यूएईमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळायची आहे. यामुळे सर्व खेळाडूंना ४ महिन्यासाठी बाहेर राहावे लागू शकते. याच कारणामुळे बटलर ऍशेस मालिकेतूनही नाव मागे घेऊ शकतो. याबरोबरच अशीही चर्चा आहे की तो भारताविरुद्ध सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेतूनही माघार घेण्याची शक्यता आहे.
पुढे बोलताना बटलर म्हणाला “ऍशेस सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या खेळाडूंसोबतच त्यांच्या परिवाराला देखील येण्याची परवानगी द्यावी. याबाबत त्यांनी आम्हाला आश्वस्त करावे.” यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड हे क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी बोलणे देखील करत आहेत.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने बाहेरून येणाऱ्यांसाठी आपल्या सीमा बंद केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये मर्यादित विमानांच्या उड्डाणाला परवानगी आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियात येणाऱ्या प्रत्येक प्रवासाला १४ दिवसांच्या विलगीकरणाचे कठोर नियम देखील करण्यात आले आहे. याबाबत बोलताना बटलर म्हणाला, “कोरोनाचा काळ सर्वांसाठी खूप कठीण काळ आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप कठोर नियम आखले आहेत.”
दरम्यान, इंग्लंड आणि भारत यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने १५१ धावांनी विजय मिळवत मालिकेत ०-१ ने आघाडी मिळवली आहे. अशाच बटलरने या मालिकेतून देखील आपले नाव मागे घेतले, तर इंग्लंड संघाला अडचण निर्माण होऊ शकते. यापूर्वीच इंग्लंडच्या अनेक खेळाडूंना दुखापतीमुळे आपले नाव मागे घ्यावे लागले होते.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्ट पासून लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–‘विरुष्का’चं सरप्राईज! लंडनमधील रेस्टॉरंटमध्ये जेवायला जात भारतीय शेफला केलं चकीत
–धोनीचा भिडू परतला! आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात चेन्नई संघासाठी ‘हा’ खेळाडू असेल उपलब्ध
–“बुमराहला कधीकधी डिवचले तर काही हरकत नाही”, माजी भारतीय क्रिकेटरचा इंग्लंड संघाला टोला