टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध २४ ऑक्टोबरला खेळवला जाईल. यामुळे आता सर्व क्रिकेट रसिकांच्या नजरा खेळाडूंच्या फॉर्मवर आणि फिटनेसवर खिळून आहेत. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर वरिष्ठ फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनची देखील टी२० विश्वचषक संघात निवड झाली आहे.
जेव्हा टी२० विश्वचषक संघात अश्विनच्या नावाची घोषणा झाली तेव्हा बरेच जण आश्चर्यचकित झाले काही चाहते आनंदीही झाले. कारण, अश्विन बऱ्याच काळापासून टी२० क्रिकेटपासून लांब होता. याशिवाय मोठ्या कालावधीनंतर अश्विन-जडेजा ही जोडी मैदानावर दिसणार होती. मात्र, आता आयपीएलमधील अश्विनचा फॉर्म पाहता हा भारतीय चाहत्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. दुसरी चिंतेची बाब म्हणजे आयपीएल स्पर्धा जिथे झाली तिथेच टी२०विश्वचषक स्पर्धा होत असल्याने अश्विनला सूर गवसेल का? हाही मोठा प्रश्न आहे.
प्रभावीहीन ठरला अश्विन
अश्विनने यंदाच्या आयपीएलमध्ये अतिशय सुमार कामगिरी केली आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या अश्विनने यंदाच्या मोसमात एकूण १३ सामने खेळले आहेत आणि त्यात त्याने फक्त सात गडी बाद केले. त्यात त्याची सरासरी ७.४१ एवढी राहिली. सन २००९ नंतर आयपीएलमध्ये ही पहिलीच वेळ आहे ज्यात अश्विनने दहापेक्षा कमी विकेट्स घेतल्या आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात त्याला शेवटच्या षटकात ७ धावा वाचवायच्या होत्या. पण यात तो अपयशी ठरला. त्याने या सामन्यात चांगली गोलंदाजी करत दोन गडीही बाद केले. धावसंख्या कमी असल्याने दिल्ली या सामन्यात विजयी होऊ शकली नाही. या एका षटकापलीकडे संपूर्ण आयपीएलमध्ये अश्विन आपला प्रभाव पाडू शकलेला नाही. आता प्रश्न उपस्थित राहत आहे की अश्विन विश्वचषकात प्लेईंग इलेव्हनमध्ये संघात स्थान मिळवू शकेलं का?
जडेजाचे खेळणे नक्की
टी२० विश्वचषकात रविंद्र जडेजाचे खेळणे पक्के समजले जात आहे. त्याच्याव्यतिरिक्त अजून दुसरा फिरकी गोलंदाज कोण असेल हा मोठा प्रश्न असेल. जर शार्दूल ठाकूरला खेळवले गेले तर अश्विनला बाकावर बसावे लागू शकते. यावरही वरूण चक्रवर्ती सध्या चांगल्या लयीत आहे त्यामुळे त्याची निवड होण्याची जास्त शक्यता असेल. या आयपीएलमध्ये युजवेंद्र चहलही चांगल्या लयीत होता पण त्याची निवड विश्वचषक संघात झालेली नाही.