कोलकाता। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात बुधवारी (१६ फेब्रुवारी) टी२० मालिकेतील (T20I Series) पहिला सामना पार पडला. कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने ६ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबरच टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दरम्यान, या सामन्यात मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला अंतिम ११ जणांच्या संघात संधी देण्यात आली नव्हती. याबद्दल आता कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने स्पष्टीकरण दिले आहे.
भारतीय संघव्यवस्थापनाने पहिल्या टी२० सामन्यासाठी ५ फलंदाज आणि १ अष्टपैलू असे संयोजन अंतिम ११ जणांच्या संघात ठेवले होते. यात रोहित शर्मा, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंत या फलंदाजांना आणि वेंकटेश अय्यर याला अष्टपैलू म्हणून संधी देण्यात आली होती. मात्र, या संघात श्रेयस अय्यर सारख्या खेळाडूला स्थान न दिल्याचे अनेकांना आश्चर्य वाटले होते. पण हा निर्णय सर्वांसाठीच कठीण असल्याचे रोहितने म्हणले आहे.
सामन्यानंतर बोलताना रोहित म्हणाला, ‘श्रेयस अय्यरसारखा खेळाडू बाहेर बसतो, हे पाहाणे खूप कठीण आहे. पण आम्हाला एक असा खेळाडू हवा होता, जो मधल्या षटकांमध्ये गोलंदाजी करेल. त्याचमुळे आम्ही त्याला संधी देऊ शकलो नाही. खरंतर संघातील जागेसाठी अशी स्पर्धा असणे चांगले आहे. मी आनंदी आहे की आमच्यासमोर खेळाडू अनुपलब्ध आहे किंवा फॉर्ममध्ये नाही अशा गोष्टींपेक्षा वेगळी आव्हाने आहेत.’
तो पुढे म्हणाला, ‘आम्ही याबद्दल श्रेयसशी स्पष्ट बोललो होतो आणि आम्ही त्याला सांगितले की, आगामी विश्वचषकासाठी हा एक पर्याय आपल्याला हवा आहे. संघातील खेळाडू समजून घेतात की, संघासाठी काय योग्य आहे आणि हे सर्व खेळाडू प्रोफेशनल आहेत आणि त्यांना संघ महत्त्वाचा असल्याचे समजते. जेव्हा आत्ता अनुपलब्ध असलेले खेळाडूही उपलब्ध असतील तेव्हा अशा गोषंटी आम्हाला बसून समजून घेण्याची गरज आहे.’
सध्या टी२० मालिकेत मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, केएल राहुल, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा असे अनेक प्रमुख खेळाडू दुखापती आणि विश्रांती दिल्याने अनुपलब्ध आहेत.
दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी२० सामना शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवरच होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अखेर ९ वर्षांनी श्रीसंत उतरला प्रथमश्रेणी सामन्यात! पहिल्या दिवशीच केले दमदार प्रदर्शन