मुंबई । क्रिकेटमधील सर्वात मोठा मॅच फिक्सर संजीव चावला याने धक्कादायक खुलासा केला आहे. त्याच्या या खुलाशाने क्रिकेट जगत पूर्ण हादरून गेले आहे. क्रिकेटमधील प्रत्येक सामना हा फिक्स असायचा, अशी माहिती त्याने दिल्ली पोलिसांच्या चौकशीत दिली. मॅच फिक्सिंग विषयी तो अधिक बोलला तर त्याच्या जीवाला धोका होईल असेही त्याने यावेळी सांगितले.
२००० साली दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱयावर आला होता. या मालिकेतील सामने फिक्स करण्यासाठी हन्सी क्रोनिया सोबत नियोजन करत होता असा आरोप चावलावर आहे. याच हन्सी क्रोनियाचे पुढे विमान दुर्घटनेत निधन झाले.
चावलाने सांगितले की, क्रिकेटमधील कोणता सामना निपक्षपणे खेळला जात नव्हता. प्रत्येक सामना फिक्स असायचा. अंडरवर्ल्डचे या सामन्यावर नियंत्रण असायचे.
चावलाने दिलेल्या जबानीनुसार या प्रकरणाची चौकशी करणारे डीसीपी क्राइम ब्रांच डॉक्टर राम गोपाळ नाईक यांच्या जीवालाही धोका आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर मॅच फिक्सिंग मधला सर्वात मोठा किंग म्हणून ओळखला जाणारा संजीव चावला दक्षिण-पूर्व दिल्लीमध्ये एक कपड्याचा व्यापारी होता. वडीलांच्या निधनानंतर त्याने व्यापार सांभाळत होता. यातच त्याला क्रिकेटमधील सट्टेबाजीचा नाद लागला. यात त्याला दसपट नफा मिळू लागला. पुढे तो बुकींच्या माध्यमातून विदेशी दौऱ्यांवरही जायला सुरुवात केली.