येत्या १८ जून पासून २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनमध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना झाल्यानंतर जुलै महिन्यात भारतीय संघाला श्रीलंका संघाविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी बीसीसीआ युवा खेळाडूंचा संघ पाठवणार आहे. कारण भारतीय संघाच्या एका तुकडीला ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिका देखील खेळायची आहे. अशातच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे?
भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर हा गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे. इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला आयपीएल स्पर्धेतून देखील माघार घ्यावी लागली होती. तसेच तो आता संघात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. परंतु त्याच्या फिटनेसवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीत म्हटले की, “श्रेयस अय्यर या दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यास सक्षम आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तो श्रीलंका दौऱ्यावर जाण्यासाठी पूर्णपणे फिट आहे का? ज्याप्रकारे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, त्यानंतर विश्रांती, पुनर्वसन आणि प्रशिक्षणानंतर पुनरागमन करण्यासाठी किमान ४ महिन्याचा कालावधी तरी लागतोच.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “श्रेयस अय्यर जर ठीक होऊन पुनरागमन करणार असेल, तर तो कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार असेल. शिखर धवननेही गेल्या २ आयपीएल हंगामात चांगली कामगिरी केली आहे. तो संघातील वरिष्ठ खेळाडू आहे. त्यामुळे शिखर देखील कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार असू शकतो. तसेच त्याने गेल्या आठ महिन्यात,भारतीय संघासाठी देखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे.”
तसेच ते हार्दिक पंड्याबद्दल बोलताना म्हणाले की,” हा, हार्दिकने मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजी केली नाही आणि अलीकडच्या काळात भारताकडूनही गोलंदाजी केली नाही. असं असलं तरी, तो आणखी एक खेळाडू आहे जो एक्स फॅक्टर आणतो आणि तो देखील एक पर्याय असू शकतो. जर त्याचे प्रदर्शन पाहिले तर, तो त्याच्यासोबत खेळत असणाऱ्या खेळाडूंपेक्षा वेगळीच छाप सोडत असतो. असो, कोणास ठाऊक असेल की अतिरिक्त जबाबदारीमुळे त्याचे प्रदर्शन आणखी चांगले होऊ शकते. ”
महत्त्वाच्या बातम्या-
आधारस्तंभ हरपला! माजी भारतीय गोलंदाजाचे वडिल कालवश, त्यांच्यासाठी अर्ध्यातून सोडली होती आयपीएल