भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने भारताला ३ महत्वाच्या आयसीसी स्पर्धांचे विजेतेपद जिंकून दिले. २००७ मधील टी-२० विश्वचषक, २०११ मध्ये वनडे विश्वचषक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स चषक जिंकणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार ठरला.
धोनीने केवळ भारतीय संघासाठी केवळ विजेतेपद मिळवले नाही तर त्याने काही ‘मॅच विनर’ खेळाडूही दिले आहेत. त्याने खेळाडूंची कौशल्य ओळखून त्यांना पुरेशी संधी दिली. हे अजूनही भारतीय संघासाठी चांगले प्रदर्शन करत आहेत.
आज या लेखातील अशा ५ खेळाडूंबद्दल जाणून घेऊ जे मॅच विनर आहेत आणि त्याचं सर्व श्रेय धोनीला जातं.
धोनीने हे ५ मॅच विनर खेळाडू भारतीय संघाला दिले.
१. शिखर धवन
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन हा एमएस धोनीने तयार केलेला एक मॅच विनर खेळाडू आहे. २०१० मध्ये धवनने भारतीय संघामध्ये पदार्पण केले. धवनने आपल्या कारकीर्दीत अनेक चढ-उतार पाहिले आहेत पण धवनच्या त्या काळात त्याला कर्णधार धोनीचा पाठिंबा होता.
धवन आणि रोहित शर्मा यांना चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान सलामीला पाठवण्याचा निर्णयही धोनीचा होता. धोनीच्या या निर्णयानंतर भारतीय संघाला एक चांगली सलामीची जोडी मिळाली, जी संघाला अजूनही मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये चांगली सुरुवात करून देते आणि मोठी धावसंख्या उभारण्यात महत्वाची भूमिका बजावते.
धवनने आत्तापर्यंत खेळलेल्या ३४ कसोटी सामन्यात ४०.६१ च्या सरासरीने २३१५ धावा तर १३६ वनडे सामन्यात ४५.१४ च्या सरासरीने ५६८८ धावा. तसेच ६१ टी-२० सामन्यात २८. च्या सरासरीने १५८८ धावा केल्या आहेत. सध्या धवन टी-२० आणि वनडे संघाचा नियमित सदस्य आहे. पण त्याला २०१८ पासून कसोटी संघातून वगळण्यात आले आहे.
२. रोहित शर्मा
भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने जागतिक क्रिकेटमध्ये आपली एक वेगळी ओळख तयार केली आहे. रोहित शर्माने २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते पण तो मधल्या फळीत फलंदाजी करायचा.
पण २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेदरम्यान रोहितच्या फलंदाजीची क्षमता ओळखून धोनीने त्याला नियमीत सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. परिणामी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रोहितने सलामीला फलंदाजी केली आणि तेव्हापासून तो सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहे.
धोनीने रोहितला सलामीची संधी दिली नसती तर भारतीय संघाला त्याच्यातील प्रतिभावान खेळाडू पहायला कदाचीत मिळाला नसता. वनडे क्रिकेटमध्ये ३ द्विशतके झळकावणऱ्या रोहितच्या नावे अनेक मोठे विक्रम आहेत. रोहित सध्या भारतीय संघाकडून तिन्ही प्रकारात खेळत आहे. तसेच तो मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघाचा उपकर्णधारही आहे.
३. रवींद्र जडेजा
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आज तिन्ही प्रकारामध्ये भारताकडून खेळताना दिसत आहे. जडेजा हा सुद्धा एमएस धोनीने भारतीय संघाला दिलेला एक मॅचविनर खेळाडू आहे. जडेजाने २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
जडेजा सुरुवातीच्या काळात संघासाठी चांगली गोलंदाजी करत होता परंतु फलंदाजीत चांगली कामगिरी होत नव्हती.
हे सर्व असूनही धोनीने रवींद्र जडेजाला संघात कायम ठेवले आणि त्याला सातत्याने संधी दिली. म्हणून आज जडेजा ज्या स्थितीत आहेत त्याचे श्रेय धोनीला जातो.
जडेजाने आतापर्यंत खेळलेल्या ४९ कसोटी सामन्यांमध्ये २१३ बळी घेत फलंदाजीत १८९६ धावा केल्या आहेत. तर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळल्या गेलेल्या १६५ वनडे सामन्यात २२९६ केल्या आणि १८७ बळी घेतले आणि ४९ टी -२० सामन्यांमध्ये त्याने ३९ बळी घेतल्या व १७३ धावा केल्या.
४. आर अश्विन
आर अश्विनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी बजावली आणि आयपीएल २००८ मध्ये चेन्नई सुपर किंग्जने अश्विनला विकत घेतले. संघाचा कर्णधार एमएस धोनीला त्यांची क्षमता समजली आणि २०१० मध्ये अश्विनला आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली.
अश्विन आज भारताच्या कसोटी संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज म्हणून काम करत आहे. तो एक उत्कृष्ट ऑफ स्पिनर आहे. तसेच गरज पडल्यास तो उपयुक्त फलंदाजीही करु शकतो.
२००८ मध्ये अश्विनला सीएसकेमध्ये जास्त संधी मिळाली नव्हती पण २००९ आणि २०१० मध्ये त्याला संधी मिळाली आणि त्याने त्या संधींची योग्य उपयोग केला. त्यानंतर धोनीने भारतीय संघात अश्विनची निवड केली. त्यावेळी हरभजन सिंग सारखा अनुभवी गोलंदाज भारतीय संघात सक्रिय असताना घेतलेला हा निर्णय खरोखर मोठा होता, परंतु धोनीने अश्विनला संधी दिली नसती तर अश्विनची कारकीर्द या टप्प्यावर पोहोचली नसती.
५. इशांत शर्मा
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आज भारतीय कसोटी संघाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करीत आहे. २००७ मध्ये अनिल कुंबळेच्या नेतृत्वात इशांतने भारतीय संघामध्ये प्रवेश केला. पण इशांतची प्रतिभा ओळखून त्याला मॅच विनर खेळाडू बनवण्याचे श्रेय एमएस धोनीला जाते.
इशांतने २००७ मध्ये पदार्पण केले पण धोनीने त्याला सतत संधी दिली. आज इशांतने कसोटीत २९७ विकेट्स घेतल्या आहेत आणि सध्या तो कसोटी संघाच्या वेगवान गोलंदाजीतील मुख्य गोलंदाजांपैकी एक आहे.
इशांतने ९७ कसोटी, ८० वनडे आणि १४ टी -२० सामने खेळले आहेत. २०१६ नंतर इशांतला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. पण तो कसोटी संघात नियमित खेळतो.
ट्रेंडिंग लेख –
भारताचे ३ दिग्गज खेळाडू ज्यांना कधीच मिळाला नाही अपेक्षित सन्मान…
भारताविरुद्ध वनडेत सर्वाधिक शतक ठोकणारे ४ फलंदाज
४०० पेक्षा जास्त टी२० सामने खेळणारे ३ खेळाडू; तिघेही आहेत एकाच संघातील
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलपूर्वी चाहत्यांना लुटता येणार या लीगचा आनंद; वेळापत्रकाची झाली घोषणा
वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतील विजयाचा फायदा; इंग्लंडने गुणतालिकेमध्ये घेतली मोठी झेप
५०० कसोटी विकेट्स घेणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडच्या या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही