भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून उभय संघात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना सोमवारी (२२ ऑगस्ट) हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे झाला. या सामन्यासह वनडे मालिकेचा शेवट झाला. या मालिकेदरम्यान कर्णधार केएल राहुल आणि प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी बरेच प्रयोग केले. परंतु संघात काही असेही खेळाडू राहिले, ज्यांना या मालिकेतील एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.
ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) आणि शाहबाज अहमद (Shahbaz Ahmed) हे ते ३ खेळाडू आहेत, ज्यांना वनडे मालिकेतील एकही सामना खेळायला मिळाला नाही. त्यामुळे आता त्यांना वनडे पदार्पण न करताच भारतात परतावे लागणार आहे.
ऋतुराज गायकवाड भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामीच्या स्थानी फिट बसू शकला असता. ऋतुराजने भारतीय संघाकडून टी२० सामने खेळले आहेत. परंतु अद्याप त्याला वनडे पदार्पणाची संधी मिळालेली नाही. अशात झिम्बाब्वेविरुद्धचे सुरुवातीचे २ सामने जिंकत मालिका खिशात घातलेला भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात शुबमन गिल किंवा शिखर धवन यांपैकी एकाला विश्रांती देत ऋतुराजला सलामीला उतरवू शकला असता. परंतु तसे झाले नाही.
ऋतुराजबरोबरच त्रिपाठीचीही निराशा झाली. ३१ वर्षीय त्रिपाठीला (Rahul Tripathi) त्याच्या आयपीएल २०२२ मधील (IPL 2022) प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय संघात (Team India) निवडले गेले होते. त्याला यापूर्वी आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकांसाठीही जागा दिली गेली होती. परंतु प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा बनवण्यात तो अयशस्वी ठरला होता. आता झिम्बाब्वेविरुद्धही तो अंतिम ११ चा भाग बनू शकलेला नाही. त्रिपाठीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले जाईल, अशी अपेक्षा होती.