जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या आयपीएलमध्ये खेळण्याचे सर्व युवा क्रिकेटपटूंचे स्वप्न असते. आयपीएलचे घोषवाक्य असलेल्या ‘येथे प्रतिभेला संधी मिळते’ नुसार जगभरातील दिग्गज खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून खेळण्याची संधी भारतातील युवा क्रिकेटपटूंना मिळत असते. त्याचेच उदाहरण म्हणजे राजस्थान रॉयल्स युवा अष्टपैलू रियान पराग होय.
नुकतेच रियानने भारतीय संघाचा व आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार असलेला विराट कोहली याच्या एका सल्ल्याने आपल्यात कसा बदल झाला, याचा खुलासा केला.
विराटने दिला हा सल्ला
रियान परागने एका क्रिकेट संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आणि विराट कोहलीच्या भेटीची आठवण जागी केली. विराटच्या एका सल्ल्याने आपल्यात कसा बदल झाला, याबाबत त्याने खुलासा केला.
रियान म्हणाला, “मी युएई येथे झालेल्या आयपीएलवेळी विराटला भेटलो. त्याने मला एक मोलाचा सल्ला दिला. तो म्हणाला, तू कधीही ऑरेंज कॅप जिंकू शकणार नाही. कारण, तू पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. त्यामुळे ऑरेंज कॅपचा विचार करू नकोस. तू फक्त एवढाच विचार कर की, संघ अडचणीत असताना आपल्याला महत्त्वपूर्ण २०-३० धावा बनवून संघाला अडचणीतून बाहेर काढायची आहे. हीच गोष्ट मी मनाशी एकदम पक्की केली आहे. ज्यामुळे माझा खेळही सुधारण्याचा मला वाटतो.”
हंगामातील पहिल्याच सामन्यात जबरदस्त कामगिरी
मागील तीन वर्षापासून राजस्थान रॉयल्स संघाचा भाग असलेला १९ वर्षीय रियान आयपीएल २०२१ च्या पहिल्याच सामन्यात चमकला. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने ११ चेंडूत १ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने २५ धावा केल्या होत्या. तसेच गोलंदाजी करताना ख्रिस गेलचा मोठा बळी देखील त्याने आपल्या नावे केलेला. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून देखील त्याने नाव कमावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भन्नाट! स्टॉयनिसला बाद करताना बटलरने पकडला अप्रतिम झेल, पाहा व्हिडिओ