रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने एकदिवसीय पाठोपाठ टी-२० मालिकेत देखील वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप (३-०) दिला. वेस्ट इंडीज संघासाठी भारत दौरा खूपच निराशाजनक राहिला आहे. दौऱ्यातील एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतील एकही सामना वेस्ट इंडीजला जिंकता आला नाही. निराशाजनक प्रदर्शनानंतर वेस्ट इंडीज संघ मायदेशासाठी रवाना झाला आहे.
वेस्ट इंडीज क्रिकेटने अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून माहिती दिली आहे की, त्यांचा संघ भारतातून मायदेशासाठी रवाना झाला आहे. इंस्टाग्राम खात्यावर वेस्ट इंडीज क्रिकेटने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांच्या संघातील खेळाडू स्वतःच्या बॅग घेऊन विमानतळावर जाताना दिसत आहेत.
दरम्यान, उभय संघातील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना भारताने १७ धावांनी जिंकला. या सामन्यात वेस्ट इंडीजचा कर्णधार कायरन पोलार्ड (kieron pollard) याने नाणेफेक जिंकली आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ विकेट्सच्या नुकसानावर १८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीज संघ ९ विकेट्सच्या नुकसानावर १६७ धावा करू शकला. त्यापूर्वी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ६ विकेट्सने विजय मिळवला, तर दुसऱ्या टी-२० सामन्यात अवघ्या ८ धावांनी संघाने विजय मिळवला होता.
मायदेशात परतल्यानंतर वेस्ट इंडीजला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत यजमानपद भूषवायचे आहे. मालिका तीन कसोटी सामन्यांची असेल त्यातील पहिला सामना ८ मार्चला सुरू होणार आहे. तर दुसरीकडे भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० आणि कसोटी मालिकेत यजमानांची भूमिका साकारणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिका २४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, तर कसोटी मालिका ४ मार्चपासून सुरू होईल.
टी-२० मालिकेत विजय मिळवून भारताने वेस्ट इंडीजविरुद्धची सलग चौथी टी-२० मालिका जिंकली आहे. चार मलिकांपैक तीन वेळा वेस्ट इंडीज संघाला क्लीन स्वीप मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी रोहित शर्माला भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार बनवले गेले. टी-२० कर्णधाराच्या रूपात रोहितचा हा ९ वा विजय ठरला आहे. पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने २०१८ मध्ये सलग ९ टी-२० सामने जिंकले होते. श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेत रोहित शर्मा सरफराजला मागे सोडू शकतो.
महत्वाच्या बातम्या –
व्यंकटेशच्या रूपात भारताला मिळाला टी२०चा ‘नवा फिनिशर’, हार्दिकसाठी बंद झाले पुनरागमनाचे रस्ते?