IPL 2024 च्या आधी मुंबई इंडियन्सनं एक मोठा निर्णय घेतला. संघानं रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याकडे जबाबदारी सोपवली.
रोहितनं 5 वेळा मुंबईला चॅम्पियन बनवलं आहे. याशिवाय त्यानं संपूर्ण टीमची जडणघडण केली आहे. एक वेळ अशी आली होती जेव्हा मुंबईला हार्दिक पांड्याला संघातून काढून टाकायचं होतं. परंतु रोहितनं हार्दिकला वाचवलं. मात्र, आता परिस्थिती खूप बदलली आहे. रोहित आणि पांड्याशी संबंधित मुद्द्यावर माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलनं प्रतिक्रिया दिली आहे.
पार्थिव पटेल एका मुलाखतीदरम्यान मुंबई इंडियन्स संघाविषयी बोलत होता. त्यानं सांगितलं की, फ्रेंचायझी जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याला संघातून काढून टाकू इच्छित होती. मात्र रोहितनं दोघांनाही वाचवलं. पार्थिव म्हणाला, “2015 मध्ये हार्दिक पांड्या संघात आला तेव्हा तो खूप फेमस झाला होता. मात्र 2016 चा सीझन त्याच्यासाठी चांगला गेला नाही. अनकॅप्ड खेळाडूला संघ लगेच सोडून देतो. संघाला वाटतं की तो 10 लाख रुपयांचा खेळाडू आहे आणि गरज पडल्यास आम्ही त्याला पुढच्या सीझनमध्ये घेऊ. मात्र रोहितनं हार्दिकला संघात कायम ठेवलं”.
माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रानंही रोहित शर्माचं कौतुक केलंय. “रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अनेक मोठे खेळाडू तयार झाले, जसे की जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि इशान किशन. त्यानं हा संघ आपल्या हातानं तयार केला आहे.
हार्दिक पांड्याच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर त्यानं 2015 मध्ये पदार्पण केलं होतं. या मोसमात त्यानं 9 सामने खेळले. या दरम्यानं त्यानं 112 धावा केल्या आणि 1 बळी घेतला. पांड्यानं एका सामन्यात नाबाद 61 धावा केल्या होत्या. IPL 2016 मध्ये त्यानं 11 सामने खेळले. या कालावधीत त्यानं 44 धावा केल्या आणि 3 बळी घेतले.
या सीझननंतर पांड्या मुंबईच्या संघातून बाहेर जाणार होता. मात्र तो पुढच्या मोसमात पुन्हा खेळला आणि त्यानं चांगली कामगिरी केली. पांड्यानं 2017 मध्ये 17 सामने खेळले. या दरम्यानं त्यानं 250 धावा केल्या आणि 6 बळी घेतले. त्यानं 2018 मध्ये 18 विकेट घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2024 पूर्वी ऋषभ पंत नेट्समध्ये करतोय हेलिकॉप्टर शॉटचा सराव, पाहा Viral Video
रोहित शर्मा अजूनही त्याचा आयपीएल संघ बदलू शकतो का? ट्रान्सफर विंडोचे नियम काय सांगतात?