ब्रिस्बेनच्या कसोटीत भारतीय संघाने अविश्वसनीय कामगिरी करत ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारली आणि चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशा फरकाने विजय मिळविला. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर गेली ३२ वर्षे ऑस्ट्रेलियन संघ पराभूत झाला नव्हता, त्यामुळे यावेळीही नवख्या खेळाडूंसह उतरणाऱ्या भारतीय संघाचा पाडाव होईल, असाच अनेकांचा होरा होता. मात्र या सगळ्या गृहितकांना आणि इतिहासाला खोटे पाडत भारताने विजय मिळविला.
आता याच कारणावरून ऑस्ट्रेलियाचा माजी स्फोटक फलंदाज मॅथ्यू हेडनने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला फटकारले आहे. ब्रिस्बेनच्या मैदानावर सामना म्हणजे ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गृहीत धरल्याची या मालिकेआधी चिन्ह होती. ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने सिडनी कसोटीत आर अश्विनला स्लेजिंग करताना ब्रिस्बेनला खेळायला येण्याच्या दिलेल्या आव्हानात पण हाच अति आत्मविश्वास झळकत होता. मात्र आता तेच ऑस्ट्रेलियाला महागात पडल्याचे विधान हेडनने केले आहे.
“क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा अहंकार पडला भारी”
दरवर्षी ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेच्या सत्राची सुरुवात ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावरून होत असते. मात्र यावेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यात बदल करत शेवटचा सामना ब्रिस्बेन येथे आयोजित केला. यावर बोलताना हेडन म्हणाला, “ज्यावेळी ब्रिस्बेनमधील कसोटीबाबत बोलले जाते, त्यावेळी त्या बोलण्यात कायमच अहंकार डोकावत असतो. ब्रिस्बेनमध्ये अतिशय अवघड परिस्थिती असते, त्यामुळे कुठल्याही विदेशी संघाला तुम्ही त्या मैदानात पहिला सामना खेळावयास लावून कोंडीत पकडू शकता.”
“पर्थच्या मैदानावरील सामना करा अनिवार्य”
हेडनने यावेळी आत्ता झाली चूक पुन्हा होऊ नये यासाठी पर्याय देखील सुचवला. तो म्हणाला, “यापुढे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या प्रत्येक भारतीय संघाला पहिला कसोटी सामना ब्रिस्बेनच्या मैदानावर खेळणे, आवश्यक करावे. तसेच संपूर्ण मालिकेत एक तरी सामना वाकाच्या (पर्थच्या) मैदानावर खेळवणे, अनिवार्य करावे.”
महत्वाच्या बातम्या:
पोर्तुगालचा ख्रिस्तीयानो रोनाल्डो ठरला सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू, या दिग्गजांना टाकले मागे
मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का मलिंगाचा आयपीएलला रामराम, नावावर आहेत एकाहून एक जबरा विक्रम