भारतीय संघाने 2011 साली तब्बल 28 वर्षांनंतर एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली दुसरा वनडे विश्वचषक जिंकला होता. अंतिम सामन्यात धोनीने मारलेला तो विजयी षटकार आजही अनेकांच्या आठवणीत आहे. रवी शास्त्रींची कॉमेंट्री आणि वानखेडे स्टेडिअमवर 28 वर्षांनी जिंकलेल्या किताबाचा क्षण चाहत्यांना आजही रोमांचित करतो. मात्र, भारतात खेळल्या गेलेल्या त्या विश्वचषकाचा किताब जिंकून देण्यात सर्वात मोलाचा वाटा युवराज सिंग याचा होता. युवराजने संपूर्ण स्पर्धेत बॅट आणि चेंडूने मोलाचे योगदान दिले होते. मात्र, माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याचा विश्वास आहे की, युवराजला त्याचे श्रेय दिले जात नाही.
का मिळत नाही युवराजला श्रेय?
गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने एएनआयच्या पॉडकास्टवर बोलताना म्हटले की, “तुम्हालाही माहितीये. तुम्ही मला सांगा की, एक खेळाडू, जो विश्वचषक 2011मध्ये मालिकावीर राहिला, त्याच्याविषयी किती लोक बोलतात? कदाचित यासाठी करत नसतील, कारण, त्याच्याकडे चांगली पीआर एजन्सी नाहीये.”
गंभीरला जेव्हा विचारले की, विश्वचषक अंतिम सामन्यात त्याची खेळी धोनीच्या खेळीमुळे दुर्लक्षित झाली होती का? यावर तो म्हणाला की, “जेव्हा लोक अंडररेटेड म्हणतात, हे तेच लोक असतात, जे योग्यप्रकारे दाद देत नाहीत. अगदी त्याप्रकारे गोष्टी दाखवत नाहीत. तसेच, चांगल्याप्रकारे कौतुकही करत नाहीत. काहीही अंडररेटेड नसते.”
ब्रॉडकास्टरवरही भडकला गंभीर
गौतम गंभीरने ब्रॉडकास्टरवरही निशाणा साधला. तो म्हणाला, “एक ब्रॉडकास्टर कधीही पीआर मशीन होऊ शकत नाही. ब्रॉडकास्टरला ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या सर्व खेळाडूंवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जर माझ्याकडे मशीन आहे आणि मला कुठल्या तरी दोनच खेळाडूंवर फोकस करायचा आहे, अशात मी 3 तासांच्या फ्रेममध्ये एकाच खेळाडूला 2 तास आणि 50 मिनिटे फोकस केले आणि एकावर 10 मिनिटे, तर निश्चितच ज्याच्यावर जास्त फोकस, तो ब्रँड बनेल.”
युवराजची 2011 विश्वचषकातील कामगिरी
युवराज सिंग याने भारतीय संघाकडून विश्वचषक 2011 (World Cup 2011) स्पर्धेत एकूण 9 सामन्यांतील 8 डावात फलंदाजी करताना 90.50च्या सरासरीने 362 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने 1 शतक आणि 4 अर्धशतकेही झळकावली होती. याव्यतिरिक्त त्याने गोलंदाजी करताना 9 डावात 25.13च्या सरासरीने आणि 5.02च्या इकॉनॉमी रेटने 15 विकेट्स घेतल्या होत्या. (gautam gambhir statement on yuvraj singh about world cup 2011 player of the tournament)
हेही वाचा-
टी20 वर्ल्डकपमध्ये कोण असेल भारताचा कर्णधार? बीसीसीआय सचिव जय शाह म्हणतात…
आता इंग्लंडची खैर नाही! निवडकर्त्यांनी 2 वर्षांनंतर दिली ‘या’ विस्फोटक फलंदाजाला टी20 संघात एन्ट्री, वाचा