भारतीय संघ पुन्हा एकदा दक्षिण अफ्रिकेतील कसोटी मालिका (sa vs ind test series) जिंकण्यामध्ये अपयशी ठरला आहे. तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारतीय संघ २-१ ने पराभूत झाला. मालिकेतील सेंचुरियनमधील पहिला सामना भारताने जिंकला होता, तर जोहान्सबर्ग आणि केपटाऊनमधील सामन्यांमध्ये दक्षिण अफ्रिकेने विजय मिळवला. विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ यावेळी पहिल्यांदा दक्षिण दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर कसोटी मालिका जिंकेल, अशी अपेक्षा होती. परंतु असे होऊ शकले नाही. कसोटी मालिकेत भारताच्या पराभवाची वेगवेगळी कारणे राहिली आहेत. आपण या लेखात त्यापैकी काही कारणांवर नजर टाकणार आहोत.
मध्यक्रमातील फलंदाजांचा खराब फॉर्म
कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या पराभवाचे प्रमुख कारण राहिले, मध्यक्रमातील फलंदाजांचा खराब फॉर्म. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे अनुभवी फलंदाजानी संपूर्ण मालिकेत निराशाजनक प्रदर्शन केले. या दोन्ही फलंदाजांनी मालिकेत २५ च्या सरासरीने धावा केल्या. तीन सामन्यांतील सहा डावांमध्ये या दोघांनी प्रत्येकी एक अर्धशतक केले. जर या दोघांपैकी एकाने केपटाऊन कसोटीत चांगली खेळी केली असती, तर संघ सामना आणि मालिका दोन्हीमध्ये विजय मिळवू शकत होता.
मालिकेत अनेक झेल सुटले
कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंनी अनेक महत्वाचे झेल सोडले. अनेकदा गोलंदाजांनी घेतलेली मेहनत खराब क्षेत्ररक्षणामुळे वाया गेली. यापैकी जास्त झेल हे यष्टीपाठी सुटले. यष्टीरक्षक आणि स्लिपमध्ये थांबलेल्या खेळाडूंना संधीचा योग्य फायदा घेता आला नाही. केपटाऊन कसोटीतही याचे एक उदाहरण पाहायला मिळाले. केपटाऊनमधील दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराने दक्षिण अफ्रिकेच्या कीगन पीटरसनचा सोपा झेल सोडला. यावेळी दक्षिण अफ्रिका विजयापासून ८६ धावांच्या अंतरावर होता. झेल सोडल्यानंतर पीटरसनने ८२ धावा केल्या. याच प्रकारे सामन्याच्या पहिल्या डावात रिषभ पंतकडून टेंबा बवुमाचा झेल सुटला होता. भारतीय खेळाडूंच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे दक्षिण अफ्रिका संघ विजयी ठरला.
प्लेइंग इलेव्हनमध्ये गडबड
या मालिकेत भारतीय संघ सहा फलंदाज आणि पाच गोलंदाजांसह मैदानात उतरला होता. परंतु, दक्षिण अफ्रिकेतील खेळपट्टीवर ही रणनीती उपयोगी ठरली नाही. रविचंद्रन अश्विनच्या रूपात भारताने एका फिरकी गोलंदाजाला देखील संधी दिली होती. मात्र, याठिकाणची परिस्थितीत आणि खेळपट्टी या दोन्ही गोष्टी फिरकी गोलंदाजीसाठी फायदेशीर नव्हत्या. पाच गोलंदाजांना संधी दिल्यामुळे एका फलंदाजाला संधी कमी मिळाली. यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये भारताने ही रणनीती वापरली होती, पण त्याठिकाणची परिस्थिती फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरली होती. दक्षिण अफ्रिकेत भारतीय संघ अश्विनऐवजी हनुमा विहारीला संधी देऊ शकत होता. विहारी चांगल्या फलंदाजीसह फिरकी गोलंदाजीही करू शकतो.
वेगवान गोलंदाज अपेक्षित प्रदर्शन करू शकले नाही
भारतीय संघाकडे सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण आहे. भारताकडे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीसारखे वेगवान गोलंदाज आहेत, जे विदेशी परिस्थितीत देखील संघासाठी फायदेशीर ठरू शकतात. असे असले तरी, दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या या कसोटी मालिकेत हे गोलंदाज लयीत दिसले नाहीत. गोलंदाजांनी मालिकेत बऱ्यापैकी प्रदर्शन केले, पण त्यांना वेळेवर विकेट्स घेता आल्या नाहीत. काही प्रमाणात नशीब भारतीय गोलेंदाजांसोबत नसल्याचे पाहायला मिळाले. अनेकदा चेंडू बॅटच्या जवळून गेला, पण बॅटला त्याचा स्पर्श होऊ शकला नाही. जर नशीबाने गोलंदाजाची थोडी साथ दिली असती, तर भारतीय संघाने मालिकेत विजय मिळवला असता.
महत्वाच्या बातम्या –
तब्बल तीस वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेचा किल्ला अभेद्य! सात भारतीय कर्णधार परतलेत रिकाम्या हाताने
पुजाराकडून ‘तो’ झेल सुटला अन् भारतीयांच्या आशेला सुरूंग लागला, पाहा व्हिडिओ
इथे तिथे नव्हे तर गोल्फच्या मैदानावर सचिन तेंडूलकर साजरी करतोय मकरसंक्रांत, बघा व्हिडिओ
व्हिडिओ पाहा –