श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेच्या अखेरच्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयासह यजमान श्रीलंकेने मालिका २-१ ने जिंकली. पहिल्या टी२० नंतर कृणाल पंड्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्याच्या संपर्कातील ८ खेळाडू शेवटचे दोन टी२० खेळू शकले नाहीत. या कारणास्तव, भारतीय संघाला उर्वरित दोन सामन्यांमध्ये नवीन खेळाडूंसह उतरावे लागले. अशा स्थितीत अनुभवाच्या अभावामुळे भारतीय खेळाडूंवर दबाव पडला आणि त्यांना शेवटच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.
मात्र, या संघात काही खेळाडू असे होते ज्यांनी त्यांच्या कामगिरीच्या आधारावर टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघातील जागेवर दावा ठोकला आहे. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे युवा लेगस्पिनर राहुल चाहर होय.
मिळालेला संधीत पाडली छाप
युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवसारख्या अनुभवी फिरकी गोलंदाजांच्या उपस्थितीमुळे राहुलला श्रीलंका दौऱ्यावर जास्त संधी मिळाली नाही. तरीही, त्याने आपली छाप सोडली. वनडे मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये राहुल प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. मात्र, भारतीय संघाने हे दोन्ही सामने जिंकून मालिका जिंकली.
यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात अनेक खेळाडूंना आजमावले. त्यात राहुलही होता. त्याने प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचे सिद्ध केले. या सामन्यात त्याने १० षटकांत ५४ धावा देऊन ३ बळी घेतले. तसेच १३ धावा केल्या. शेवटचा सामना भारताने गमावला. परंतु, त्याने श्रीलंकेचे तीन महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केले होते.
टी२० मालिकेत दाखवला जलवा
टी२० मालिकेतील पहिल्या सामन्याला मुकल्यानंतर दुसऱ्या सामन्यापूर्वी युजवेंद्र चहलला क्वारंटाईन व्हावे लागल्याने राहुलला संधी मिळाली. त्याने या सामन्यात २७ धावा देत एक गडी बाद केला. तिसऱ्या सामन्यात त्याने आणखी प्रभावी गोलंदाजी करताना केवळ १५ धावा देत ३ गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे या सामन्यात श्रीलंकेचे तीनच गडी बाद झाले व ते सर्व राहुलने बाद केले.
विश्वचषकासाठी मिळू शकते संधी
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात युएई येथे आयोजित करण्यात आलेल्या टी२० विश्वचषकासाठी फिरकीपटू म्हणून राहुलने दावेदारी पेश केली आहे. सध्या भारतीय संघात कोणत्याही फिरकीपटूची जागा सुरक्षित नाही. रवींद्र जडेजा व चहल-कुलदीप जोडी देखील या विश्वचषकात खेळण्यासाठी उत्सुक आहे. आधी आयपीएल व आता श्रीलंका दौऱ्यावरील कामगिरीमुळे राहुल या स्थानावर निवडला जाऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
अंतिम टी२० सामन्यानंतर शनाका अन् संघाने घेतली कर्णधार धवनची भेट, ‘या’ विषयावर झालं बोलणं
श्रीलंका मोहिमेवरून ‘धवनसेने’ची मायदेशी रवानगी, कृणालसह तिघे श्रीलंकेतच; पण सूर्या-पृथ्वीचं काय?
बाय बाय डरहॅम! पहिल्या कसोटीसाठी नॉटिंघमला रवाना झाली विराटसेना, ‘या’ मैदानावर करणार सराव