सध्या भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त आहे. आयपीएलनंतर भारतीय संघ सातत्याने खेळताना दिसतोय. मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाने टी२० मालिका खेळली. त्यानंतर आयर्लंड व इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ खेळला. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीजमध्ये आहे. तीन सामन्यांची वनडे मालिका शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघाने जिंकली. त्यानंतर ५ सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. त्यानंतर सहा वर्षाच्या कालावधीनंतर भारतीय संघ झिंबाब्वे दौऱ्यावर जाईल. पुढे आशिया चषक व विश्वचषक खेळले जाणार आहेत. या मधल्या काळात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाशी मालिका खेळणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्याचमुळे आपल्याला पुन्हा एकदा एकाच वेळी दोन वेगळ्या देशात भारताचे दोन संघ खेळताना दिसतील.
सध्या भारतीय संघाचे पूर्ण लक्ष ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकावर आहे. तत्पूर्वी, अधिकाधिक टी२० सामने खेळण्याचा भारतीय संघ प्रयत्न करतोय. त्यासाठीच आशिया चषक टी२० प्रकारात खेळला जाईल. मात्र, आशिया चषकानंतर भारतीय संघ आणखी दोन मजबूत संघांशी भिडेल. हे दोन्ही संघ अनुक्रमे ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी२० सामने खेळले जाणार आहेत. हे सामने अनुक्रमे २०, २३ आणि २५ सप्टेंबर रोजी मोहाली, नागपूर आणि हैदराबाद येथे खेळवले जातील. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत तिरुअनंतपुरम, गुवाहाटी आणि इंदूर येथे टी२० सामने पार पडतील. त्यानंतर ६ ते ११ ऑक्टोबर दरम्यान रांची, लखनऊ आणि दिल्ली येथे वनडे सामने होतील.
टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पहिल्या पसंतीचे भारतीय खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. या मालिकेत नियमित कर्णधार रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करताना दिसेल. त्याचवेळी वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आपापल्या दुय्यम दर्जाच्या संघांना मैदानात उतरवू शकतात. भारतात होणाऱ्या या मालिकेत पुन्हा एकदा शिखर धवन कर्णधार म्हणून भूमिका बजावू शकतो. भारतीय संघ मागील काही काळापासून सातत्याने अनेक खेळाडूंना संधी देत आहे. याचा उद्देश भारतीय क्रिकेटची दुसरी फळी निर्माण करणे आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कॅप्टन रोहित होणार आणखीनच हीट! दोन वेळच्या विश्वविजेत्या कर्णधाराला टाकणार मागे
CWG Breaking: अवघ्या १९ व्या वर्षी जेरेमीने रचला इतिहास! जिंकले कॉमनवेल्थ गोल्ड
शाहरूख खानने अवघ्या चार चेंडूत विरोधी संघाच्या अंतिम फेरीच्या आशेवर फेरले पाणी