भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड दौऱ्यातील वनडे मालिकेची खराब सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने भारताचा दारुण पराभव केला. भारताच्या पराभवानंतर चाहत्यांपासून ते माजी क्रिकेटपटूंपर्यंत अनेकांनी नाराजी व्यक्त करत आगपाखड केली आहे. यामध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये भारताच्या दृष्टीकोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. वॉनच्या मते, भारतीय संघ या क्रिकेट प्रकारात सुमार क्रिकेट खेळत आहे.
ऑकलंडमध्ये पार पडलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 7 विकेट्सने पराभूत केले. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने 50 षटकात 7 विकेट्स गमावत 306 धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने 47.1 षटकात 3 विकेट्सच्या मोबदल्यात 309 धावा करत आव्हान गाठले आणि सामना जिंकला. टॉम लॅथम याच्या जबरदस्त शतकासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
वसीम जाफरकडून न्यूझीलंडचे कौतुक
भारताच्या पराभवानंतर माजी सलामीवीर वसीम जाफर याने ट्वीट करत न्यूझीलंड संघाचे कौतुक केले. त्याने म्हटले की, “न्यूझीलंड संघाने चांगला खेळ दाखवला. 300 धावांना तुम्ही 270 प्रमाणे बनवले. केन विलियम्सन याने त्याचा दर्जा दाखवला, पण टॉम लॅथम याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले. एक सलामीवीर म्हणून मधल्या फळीत येऊन यशस्वी होणे सोपे नसते. भारतीय संघाने फक्त 5 गोलंदाज खेळवून मोठी चूक केली.”
Well played @BLACKCAPS ???????? Made 300 look like 270. Williamson all class as always but Latham stole the show. Not easy for an opener to move down the order and still be successful. India missed a trick by just playing 5 bowlers. #NZvIND pic.twitter.com/bcGnf6K5Ry
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) November 25, 2022
‘भारतीय संघ जुन्या काळासारखा वाटतोय’ – मायकल वॉन
वसीम जाफरच्या ट्वीटवर मायकल वॉन (Michael Vaughan) याने म्हटले की, “भारतीय संघ जुन्या काळासारखा वाटतोय. तुम्हाला जर सात नसेल, तर कमीत कमी सहा गोलंदाजांच्या पर्यायाची गरज आहे.”
They are a dated ODI team .. you need at least 6 if not 7 bowling options .. https://t.co/UXsgWb2PvN
— Michael Vaughan (@MichaelVaughan) November 25, 2022
श्रेयस अय्यरचे वक्तव्य
भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने या पराभवाबद्दल वाच्यता केली. तो म्हणाला की, “ज्याप्रकारच्या परिस्थितीत आम्ही होतो, तिथून 307 धावसंख्या खूप चांगली होती. निश्चितरीत्या काही गोष्टी आमच्यासाठी योग्य ठरल्या नाहीत. मात्र, यामधून आम्ही शिकू शकतो. आम्ही या पराभवाचे विश्लेषण करू आणि पुढील सामन्यात नवीन कल्पनेसोबत उतरू.”
वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी (दि. 27 नोव्हेंबर) हॅमिल्टन येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. (india are a dated odi team says england former captain michael vaughan)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जम्मू-काश्मीरचा जबरदस्त विक्रम! देशांतर्गत क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केली ‘अशी’ कामगिरी
उमरान मलिकसाठी टी-20 पेक्षा वनडे क्रिकेटच चांगले! भारतीय दिग्गजाकडून मिळाला सल्ला