गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) मंगळवारी जीएमसी स्टेडियमवर चेन्नईयीन एफसीसमोर एटीके मोहन बागान संघाचे आव्हान असेल.
या लढतीची तयारी करताना चेन्नईयीनचे प्रशिक्षक क्साबा लॅसझ्लो यांच्यासमोर वेगळीच समस्या आहे. चेन्नईयीनकडून आतापर्यंत सहा वेगवेगळ्या खेळाडूंनी गोल केले आहेत, पण गोल करण्याची जबाबदारी असलेल्या स्ट्रायकर्सना पुरेशा प्रमाणात लक्ष्य गाठता आलेले नाही.
एटीकेएमबीविरुद्ध चेन्नईयीनची कसोटी लागेल. यंदा आतापर्यंत खुल्या खेळातून एटीकेएमबीविरुद्ध गोल झालेला नाही. अशावेळी चेन्नईयीनला काही गुणांची कमाई करायची असेल तर जेकब सिल्व्हेस्टर याच्यासारख्या खेळाडूला सरस कामगिरी करणे आवश्यक असेल.
वेगवेगळ्या खेळाडूंकडून गोल होत असल्याबद्दल लॅसझ्लो यांनी आनंद व्यक्त केला. हे योगायोगाने घडत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, आमच्याकडे गोल करणारा एकच खेळाडू नाही. डाव्या, उजव्या बाजूने तसेच मध्य भाग अशा वेगवेगळ्या ठिकाणांवरून गोल करणारे खेळाडू आहेत. हे थोड्याफार प्रमाणात आमच्या डावपेचांमुळे शक्य झाले आहे.
आघाडी फळीने संधी दवडण्याचे प्रमाण कमी होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. लालियनझुला छांगटे याला चांगल्या स्थितीतून लक्ष्य साधण्यात अपयश आले होते. अखेरीस एससी ईस्ट बंगालविरुद्ध त्याने गोलची प्रतिक्षा संपवली. किमान एक गोल केलेल्या खेळाडूंमध्ये संधीचे गोलमध्ये रुपांतर करण्याची सर्वांत कमी 5.26 अशी टक्केवारी सिल्व्हेस्टरची आहे.
लॅसझ्लो यांनी सांगितले की, आमच्या मुख्य स्ट्रायकर्सनी आणखी गोल केले तर मला फार आनंद होईल. खरे तर मागील सामन्यात सुद्धा आम्ही बऱ्याच संधी दवडल्या. त्याचवेळी अनेक भारतीय खेळाडूंनी गोल केल्यामुळे मला आनंद वाटतो. रहीम अली, लालियनझुला छांगटे व अनिरुध थापा अशा खेळाडूंनी गोल केले आहेत. हे सुद्धा महत्त्वाचे आहे.
एटीकेएमबीविरुद्ध चेन्नईयीनला अखेरच्या क्षणापर्यंत दक्ष राहावे लागेल. याचे कारण अखेरच्या क्षणी निर्णायक गोल करण्याची हातोटी एटीकेएमबीने आत्मसात केली आहे. अखेरच्या 15 मिनिटांत चार वेळा गोल करण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. एटीकेएमबीचे प्रशिक्षक अँटोनिओ लोपेझ हबास यांच्या कौशल्यपूर्ण कार्यपद्धतीमुळे हे घडते. मैदानावर परिस्थिती जशी उलगडते त्यानुसार प्रतिसाद देत ते बदली खेळाडू उतरवतात.
ते म्हणाले की, तुम्ही एका गोष्टीसाठी तुमच्या संघाकडून तयारी करून घेऊ शकता आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी संघ काहीतरी वेगळे करू शकतो. अशावेळी तुमच्या डावपेचांच्या कल्पना अत्यंत स्पष्ट असल्या पाहिजेत. मगच तुम्ही प्रतिस्पर्ध्याच्या डावपेचांशी जुळवून घेऊ शकता.
एटीकेएमबीचे पारडे जड असले तरी हिरो आयएसएलमध्ये कोणताही सामना सोपा नसल्याची जाणीव असण्याइतपत या स्पर्धेचा अनुभव हबास यांच्याकडे आहे. ते म्हणाले की, चेन्नईयीनकडे फार चांगले खेळाडू आहेत आणि हा सामना आमच्यासाठी फार अवघड आहे. संपूर्ण सामन्यात आमच्या संघाला लक्ष केंद्रीत करावे लागेल.