यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाहुणा भारत संघात ऍडलेड येथे पहिला कसोटी सामना चालू आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील या एकमेव दिवसरात्र सामन्यात भारतीय संघ चांगले प्रदर्शन करताना दिसत आहे. पहिल्या डावात त्यांनी ६६ धावांची आघाडी मिळवली आहे. यात भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनचा मोठा हात आहे. त्याने पहिल्या डावात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. याच अश्विनने आपल्या गोलंदाजी पद्धतीविषयी वक्तव्य केले आहे. यशस्वी गोलंदाजीचे सूत्र शोधण्यासाठी आपले स्वत:चे तंत्र असल्याचे त्याने सांगितले आहे.
अश्विनची गोलंदाजी आकडेवारी
पहिल्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २४४ धावा केल्या. त्यांच्या या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघ १९१ धावांवरच सर्वबाद झाला. दरम्यान अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या चार फलंदाजांना तंबूत धाडले. सर्वप्रथम त्याने ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथची विकेट काढली. त्यानंतर कॅमरॉन ग्रीन, मॅथ्यू वेड आणि नॅथन लियॉनला पव्हेलियनला पाठवले.
काम करण्याची पद्धत शिकू शकता- अश्विन
पुढे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर अश्विनने आपल्या गोलंदाजीच्या पद्धतीविषयी वक्तव्य केले. तो म्हणाला की, “आपणा सर्वांना माहिती आहे की एकच गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे शिकता येऊ शकते. आपण दुसऱ्या व्यक्तीकडून त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीविषयी शिकू शकतो. जेव्हा एखादा फिरकीपटू परदेशात खेळत असतो. तेव्हा आपण किती धावा वाचवल्या आणि किती विकेट घेतल्या, यांचा सखोल अभ्यास करायला पाहिजे. माझे या गोष्टीवर पूर्ण लक्ष असते.”
“मी सदैव काही ना काही नवे शिकण्याच्या प्रयत्नात असतो. इतर व्यक्ती या गोष्टीला कशाप्रकारे घेतात, ते त्यांच्यावर निर्भर करते. गेल्या दोन वर्षांमधील माझे प्रदर्शन पाहिले, तर परदेशात मी ठीक ठाक गोलंदाजी केली आहे,” असे शेवटी बोलताना अश्विनने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
“दुसऱ्या कसोटी सामन्यात नका देऊ संधी”, पृथ्वी शॉच्या फ्लॉप खेळीला पाहून वैतागले समालोचक
विराटच्या पहिल्या बाळाचा पाळणा हालणार ऑस्ट्रेलियात?, माजी ऑसी क्रिकेटरने दिले आमंत्रण
पृथ्वी शॉची खराब फिल्डिंग पाहून भारतीय कर्णधाराचा राग अनावर, मैदानावरच दिली शिवी