भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (virat kohli) मागच्या मोठ्या काळापासून अपेक्षित प्रदर्शन करू शकलेला नाही. चाहते त्याच्या शतकी खेळीची मागच्या बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर (sanjay bangar) यांनी विराटच्या मागच्या काही दिवसांपासूनच्या खराब प्रदर्शनाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते अनेक दिग्गज खेळाडूंना अशाप्रकारच्या वाईट काळातून जावे लागले आहे.
दरम्यान, विराटने त्याचे शेवटचे शतक दोन वर्षांपूर्वी केले होते. त्याने हे शतक बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यात केलेले. त्या शतकानंतर विराट अपेक्षित प्रदर्शन करू शकलेला नाही. त्याने मागच्या दोन वर्षात खेळलेल्या १३ कसोटी सामन्यात अवघ्या २६.०४ च्या सरासरीने ५९९ धावा केल्या आहेत
संजय बांगर एका चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांना प्रश्न विचारला गेला की, विराट कोहली आगामी दक्षिण अफ्रिका दौऱ्यात त्याच्या शतकाचा दुष्काळ संपवू शकेल का ? या प्रश्नाच्या उत्तरात बांगर म्हणाले, “सर्व प्रकारांमधील मिळून ५७ डाव झाले आहेत. ज्यात त्याने शतक केले नाही. अगदी सचिन तेंडूलकर आणि राहुल द्रविडला देखील अशा टप्प्यातून जावे लागले होते. पण याचा अर्थ असा नाही की, यादरम्यान त्यांनी संघासाठी त्यांचे योगदान दिले नाही.”
बांगर यांच्या मते विराटने या दरम्यानच्या काळात शतक केले नाही. मात्र, त्याने संघासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. ते पुढे म्हणाले की, “जर तुम्ही मागच्या मालिकेत विराट कोहलीला पाहिले, तर त्याने अनेक अप्रतिम अर्थशतके केली होती. त्याने अनेकदा ३५-४० धावा केल्या आणि त्यामुळे भारतीय संघाला खूप फायदा झाला.”
दरम्यान, विराटचे मागच्या दोन वर्षातील प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले आहे. मागच्या महिन्यात पार पडलेल्या टी२० विश्वचषकानंतर त्याने स्वतःच्या इच्छेने टी२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. मात्र, बीसीसीआयने भारताच्या आगामी दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी एक मोठा निर्णय घेतला. बीसीसीआयने या दौऱ्यापूर्वी विराटला भारताच्या वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवले आणि रोहित शर्माला ती जबाबदारी सोपवण्यात आली. आता भारताच्या वनडे आणि टी२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी रोहित शर्माकडे आणि कसोटी संघाचे कर्णधारपद विराटकडे कायम आहे. विराट आगामी दौऱ्यात शतकी खेळी करण्याच्या प्रयत्नात असेल.
महत्वाच्या बातम्या –
‘एकदा युवराज पहाटे ३.३० वाजता आला आणि…’, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत विराटचा जुन्या आठवणींना उजाळा
आयएसएल: नॉर्थ ईस्ट युनायडेटविरुद्ध हैदराबाद एफसीचे पारडे जड; अव्वल चौघांत स्थान पटकावण्याची संधी