अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर बुधवारी (३ नोव्हेंबर) भारत आणि अफगानिस्तान संघ आमने सामने येणार आहेत. पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाकडून पराभूत झालेल्या भारतीय संघाचा उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग कठीण झाला आहे. त्यामुळे भारतीय संघाला जर उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग सोपा करायचा असेल तर या सामन्यात मोठ्या अंतराने विजय मिळवावा लागणार आहे.
परंतु हे काम इतकं सोपं नसणार आहे. कारण अफगानिस्तान संघ देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे भारतीय संघाला काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी विराटसेनेला एक कानमंत्र दिला आहे.
सुनील गावसकर यांनी इंडिया टुडेसोबत बोलताना म्हटले की, “तीन फिरकी गोलंदाजांना घेऊन मैदानात जाणं वाईट नसेल. भारतीय संघाने २ वेगवान गोलंदाज आणि ३ फिरकी गोलंदाजांसह मैदानात जावं. कारण जर हार्दिक पंड्या खेळणार असेल तर २-३ षटके मध्यमगती गोलंदाजी करू शकतो. आर अश्विनसारखा फिरकीपटू या संघात असायलाच हवा. तो डाव्या-उजव्या कुठल्याही हाताच्या फलंदाजाला गोलंदाजी करतोय हे महत्वाचं नाहीये. मला अश्विनला प्लेइंग ईलेव्हनमध्ये पाहायचं आहे. जर तो (विराट) अशा कुठल्या गोलंदाजाच्या शोधात असेल जो सामन्याची गती कमी करू शकतो. तो राहुल चाहर आहे.”
सुनील गावसकर यांनी सांगितलेल्या कानमंत्राचा वापर केला, तर भारतीय संघात आर अश्विन, वरूण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा हे तीन फिरकीपटू खेळताना दिसून येऊ शकतात. परंतु जर राहुल चाहरला संधी दिली गेली तर आर अश्विनला संघाबाहेर बसावे लागु शकते. भारतीय संघाने सुरुवातीच्या २ सामन्यात २ फिरकी गोलंदाज आणि ३ वेगवान गोलंदाजांचा वापर केला होता. परंतु ही रणनिती कामी आली नाही.
तसेच सुनील गावसकर यांनी गोलंदाजीसह फलंदाजीमध्ये काय बदल करावा याबाबत देखील आपले मत मांडले. सुनील गावसकर यांचे स्पष्ट म्हणणे आहे की, “गेल्या सामन्यात काय झाले हे विसरून रोहित शर्माने डावाची सुरुवात करावी. तो एक असा फलंदाज आहे, जो १५ षटक टिकला तर भारतीय संघाला १८० ते २०० धावा करता येऊ शकतात.”
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडचे ‘मिशन सेमीफायनल’! स्कॉटलंडविरूद्ध ‘या’ रणनितीने उतरणार मैदानावर
अफगाणिस्तानला पछाडण्यासाठी ‘थिंक टॅंक’ने कसली कंबर; सराव सत्रात आखली रणनिती
वातावरण तापलं! डी कॉकचे सलग २ चौकार अन् बांगलादेशी गोलंदाजांचा चढला पारा, केली शिवीगाळ