ब्रिस्बेनच्या कसोटीतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय खेळाडू मायभूमीत परतले आहेत. यानंतर आता युवा भारतीय क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदर चर्चेत आला आहे. सुंदरने शनिवारी (२३ जानेवारी) सोशल मीडियावर आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये सुंदरच्या वडिलांच्या हातात ३०१ नंबर असलेली भारतीय कसोटी संघाची टोपी (टेस्ट कॅप) असल्याचे दिसत आहे.
ब्रिस्बेन कसोटीद्वारे सुंदरने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यासह भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणारा सुंदर ३०१वा खेळाडू ठरल्याने त्याला ही टोपी देण्यात आली होती. आपल्या अनमोल वस्तूपैंकी एक असलेली कसोटी टोपी आपल्या वडिलांच्या हाती सोपवत सुंदरने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. सुंदरच्या या कृत्याचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे.
ब्रिस्बेन कसोटीत सुंदरने दिले महत्त्वपुर्ण योगदान
ब्रिस्बेन कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव ३६९ धावांवर गुंडाळण्यात सुंदरने मोलाचा वाटा दिला होता. यावेळी त्याने ८९ षटके गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले होते. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथ हा त्याचा पहिला शिकार बनला. तर पुढे कॅमरॉन ग्रीन आणि नॅथन लायन यांना त्याने त्रिफळाचीत केले.
त्यानंतर भारताकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना सुंदरने १४४ चेंडूत ४३.०६च्या स्ट्राईक रेटने ६२ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने १ षटकार आणि ७ चौकार मारले. याबरोबरच त्याने शार्दुल ठाकूरसह ७ व्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारीही रचली. अखेर मिचेल स्टार्कने कॅमरॉन ग्रीनच्या हातून त्याला झेलबाद केले.
Priceless Possessions. ???????????? pic.twitter.com/HYh3YnaUR8
— Washington Sundar (@Sundarwashi5) January 23, 2021
खास कामगिरीनंतरही वडील होते हताश
सुंदरच्या अतुलनीय कामगिरीनंतरही त्याचे वडील एम सुंदर त्याच्या खेळीवर नाखूश असल्याचे दिसून आले होते. त्यांना सुंदरकडून अर्धशतकी नव्हे तर शतकी खेळीची अपेक्षा होती. सोबतच आपल्या मुलामध्ये वरच्या फळीत फलंदाजी करण्याची क्षमता आहे. परंतु त्याला ब्रिस्बेन कसोटीत केवळ खालच्या-मधल्या फळीत फलंदाजीसाठी निवडल्याची खंत त्यांना होती.
याविषयी आयएएनएसशी बोलताना एम सुंदर होते म्हणाले की, “सुंदरने ब्रिस्बेन कसोटीत अतिशय विशेष फलंदाजी केली. परंतु तो त्याची तीच खास खेळी शतकात रुपांतरित न करु शकल्याने मी हताश झालो आहे. कमीतकमी शार्दुल आणि नवदीप सैनी बाद झाल्यानंतर मोहम्मद सिराजसोबत मिळून त्याने जोरदार फटकेबाजी करायला हवी होती. परंतु त्याने पळून एक-दोन धावा घेण्याला प्राधान्य दिले.”
“मला माहिती आहे की, सुंदर पुल शॉट्स आणि जोरदार फटके मारु शकतो. त्याच्या क्षमतेनुसार त्याने मोठी खेळी साकारण्याचा प्रयत्न करायला हवा होता. परंतु त्याने ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला. परिणामत: भारतीय संघाला कमी धावांची आघाडी मिळाली असती,” असे ते पुढे बोलताना म्हणाले होते.
तसेच शेवटी एम सुंदर यांनी सांगितले होते की, “तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेल्यापासून दररोज मी त्याला बोलत असतो. मी त्याला फार पुर्वीच सांगितले होते की, जेव्हाही तुला संधी मिळेल, तेव्हा तू मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न कर आणि संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचल.”
महत्त्वाच्या बातम्या-
सिडनीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंसह एकत्र लिफ्टमध्ये जाण्याची परवानगी नव्हती, आर अश्विनचा खळबळजनक खुलासा
‘आरसीबी’तून आऊट ‘सीएसके’त इन? उमेश यादवच्या त्या कृतीनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधान
अँडरसनची कमाल! आशिया खंडात ‘अशी’ कामगिरी करणारा सर्वात वयस्कर वेगवान गोलंदाज