न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना सध्या कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना संपल्यानंतर मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना ३ डिसेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यापूर्वी कानपूर कसोटीत विश्रांतीवर असलेला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली चर्चेत आला आहे. सुट्टीवर असूनही तो येत्या सामन्यासाठी जोरदार वर्कआऊट करताना दिसत आहे.
शनिवारी दुपारी (२७ नोव्हेंबर) विराटने आपल्या अधिकृत ट्वीटर अकउंटवर जिममध्ये घाम गाळतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याचा हा व्हिडिओ काही क्षणातच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
२८ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये विराट आपल्या मांडींच्या मांसपेशी मजबूत करण्यासाठी कसरत करताना दिसतो आहे. आपला हा कसरत करतानाचा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये प्रेरक असा संदेशही दिला आहे. डॅन्जल वॉशिंग्टन या अमेरिकन अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांचे एक प्रसिद्ध वाक्य त्याने आपल्या कॅप्शनमध्ये जोडले आहे. ‘कष्टापेक्षा सहजपणा हा प्रगतीसाठी मोठा धोका आहे’, असे कॅप्शन त्याने आपल्या व्हिडिओवर दिले आहे.
"Ease is a greater threat to progress than hardship” – denzel Washington pic.twitter.com/QvYgfSSmO7
— Virat Kohli (@imVkohli) November 27, 2021
यापूर्वी ‘रनमशीन’ विराट मुंबईच्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये सराव करताना दिसला होता. विशेष म्हणजे, विराटने त्याचे नवीन प्रशिक्षक संजय बांगर यांच्यासोबत फलंदाजीचा सराव केला आहे. संजय बांगर यांनी आयपीएल २०२२ साठी विराटच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली आहे.
Away from cricket? Not really!!
Virat Kohli busy in a net session with Sanjay Bangar in Mumbai.#ViratKohli #SanjayBangar #IndiaCricket pic.twitter.com/YS701cC07Q
— Cricbuzz (@cricbuzz) November 25, 2021
यावरुन विराट आगामी मुंबई कसोटीत मोठी खेळी करत मैदानावर दमदार पुनरागमन करण्यासाठी आतुर असल्याचे दिसते आहे. विराटने मागच्या जवळपास दोन वर्षांपासून अपेक्षित प्रदर्शन केलेले नाही. त्याने यादरम्यान एक देखील शतक ठोकले नाही. विराटने आतापर्यंत क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये ७० शतक केले आहेत आणि मागच्या दोन वर्षांपासून या आकड्यात कसलीच वाढ झालेली नाही. त्याने त्याचे शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळताना ईडन गार्डनमध्ये केले होते. त्यानंतर विराट मोठ्या धावा करण्यात संघर्ष करताना दिसतो आहे.
दरम्यान, विराटच्या शेवटच्या शतकानंतर त्याच्या प्रदर्शनाचा विचार केला तर ते खूपच निराशाजनक आहे. यादरम्यान खेळलेल्या १५ डावांमध्ये त्याने अवघ्या २६.८० च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मागच्या २१ डावांमध्ये तो तीन वेळा शून्य धावा करून बाद झाला आहे, तर चार वेळा तो एक आकडी धावसंखेवर बाद झाला आहे. मागच्या जवळपास दोन वर्षात त्याने पाच अर्धशतक केले आहे आहेत. एकंदरीत विचार केला तर विराटने त्याच्या मागच्या ५६ आंतरराष्ट्रीय डावांमध्ये एकदाही शतक केले नाही. त्यामुळे विराटकडून चाहत्यांना यापेक्षा खूपच चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ तीन भारतीय फलंदाजांनी केले प्रेक्षकांचे मनोरंजन, कसोटीत देखील मारले सर्वाधिक षटकार
कानपूरचे स्टेडियम का आहे श्रेयस अय्यरसाठी खास? पाहा दोन मुंबईकरांची मन जिंकणारी मुलाखत