भारत आणि श्रीलंका (INDvSL) यांच्यातील मोहाली कसोटीचा दुसरा दिवस पूर्णपणे फक्त एकाच खेळाडूच्या नावावर होता तो म्हणजे रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja). शनिवारी (५ मार्च) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय क्रिकेट संघाच्या या स्टार अष्टपैलू खेळाडूने संस्मरणीय आणि विक्रमी खेळी खेळून इतिहास रचला. गोलंदाजीत नेहमीच छाप पाडणाऱ्या जडेजाने कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी खेळताना नाबाद १७५ धावांची खेळी केली. त्याला द्विशतक झळकावण्याची संधी होती. मात्र, त्याला द्विशतक पूर्ण करण्याची संधी का देण्यात आली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भारतीय संघाने ५७४/८ धावांवर डाव घोषित केला. आता जडेजाने खुलासा केला आहे की, खेळपट्टीच्या मदतीचा फायदा घेता यावा यासाठी संघाचा डाव घोषित करावा, अशी मागणी मीच केली होती.
सामन्याच्या पहिल्या दिवशी अर्धशतकाच्या जवळपास नाबाद परतलेल्या जडेजाने शनिवारी पीसीए स्टेडियमवर आपला डाव वाढवला आणि जबरदस्त फलंदाजी केली. २२८ चेंडूंच्या संपूर्ण खेळीत त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांना एकही संधी दिली नाही. आधी त्याने कारकिर्दीतील दुसरे कसोटी शतक झळकावले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात धावांचा वेग वाढवला. यादरम्यान त्याने प्रथम रविचंद्रन अश्विन आणि नंतर मोहम्मद शमीसोबत नवव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. चहापानाच्या अगदी आधी, जेव्हा तो दुहेरी शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता, तेव्हा कर्णधार रोहित शर्माने डाव घोषित केला.
अशी होती योजना
जडेजा ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता आणि शमी त्याला साथ देत होता, त्यावरून तो काही षटकांत पहिले द्विशतक झळकावेल असे वाटत होते. पण तसे झाले नाही. अशा स्थितीत दिवसाचा खेळ संपल्यावर जडेजाला याबाबत प्रश्न विचारला असता, त्याने सांगितले की, प्रत्यक्षात ही त्याचीच सूचना होती. जडेजा म्हणाला,
“मी त्यांना (संघाला) सांगितले की खेळपट्टीवर ‘व्हेरिएबल बाउन्स’ आहे आणि चेंडू वळू लागले आहेत. मी संदेश पाठवला की खेळपट्टीवरून काही मदत मिळू शकते. आपण त्यांना (श्रीलंकेला) आता फलंदाजीसाठी आणले पाहिजे.”
जडेजाने असेही सांगितले की, श्रीलंकेचे खेळाडू बराच वेळ मैदानावर असल्यामुळे आलेल्या थकव्याचाही संघाला फायदा घ्यायचा होता. तो म्हणाला, “ते पहिल्या दोन दिवसांत ५ सत्रे क्षेत्ररक्षण करून थकले होते. त्यामुळे तो येताच मोठे फटके खेळून दीर्घकाळ फलंदाजी करत राहणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. त्यामुळे डाव लवकर घोषित करून विरोधी फलंदाजांच्या थकव्याचा फायदा घ्यायचा, अशी योजना आखण्यात आली होती.” स्वतः जडेजाने गोलंदाजी करत दोन बळी मिळवले.
महत्वाच्या बातम्या-
रोहित-विराट यांच्यात आहे का वाद? हा व्हिडिओ पाहून मिळेल उत्तर (mahasports.in)