भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान चार कसोटी सामन्यांची ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दोन्ही तुल्यबळ संघ असल्याने मालिका चुरशीची होऊ शकते. या मालिकेविषयी अनेक माजी खेळाडू आपली मते आणि अंदाज व्यक्त करत आहेत. याच यादीत आता भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचे नाव सामील झाले आहे. आगामी कसोटी मालिकेत विराट नसल्यास काहीतरी कमी असल्याचे वाटत राहील, असे सचिनने म्हटले आहे.
पुढील आठवड्यात सुरू होईल बॉर्डर-गावसकर ट्रॉफी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान या दौऱ्याच्या सुरुवातीला वनडे मालिका खेळवली गेली. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. त्यानंतर झालेल्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत भारताने पुनरागमन करत मालिका २-१ ने आपल्या नावे केली. दौऱ्याच्या अखेरीस, चार कसोटी सामन्यांची ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ १७ डिसेंबर पासून सुरू होईल. ऍडलेड येथे खेळली जाणारी पहिली कसोटी दिवस-रात्र स्वरूपात खेळवली जाईल.
विराटच्या नसण्याने काहीतरी सुने-सुने वाटेल
आगामी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिके संदर्भात सचिनने एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्यावेळी बोलताना सचिन म्हणाला, “भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी कसोटी मालिका खूपच चुरशीची होईल. मात्र, भारतीय कर्णधार विराट कोहली पूर्ण मालिकेसाठी उपलब्ध नसल्याने मालिकेत सुने-सुने वाटेल. परंतु आपल्याला समजून घेतले पाहिजे की, हा एक सांघिक खेळ आहे. भारताकडे बाकावर अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहेत, जे सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील असतील.
विराट पालकत्व रजेमुळे परतणार आहे भारतात
भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली ऍडलेड येथील पहिल्या दिवस-रात्र कसोटीनंतर भारतात परतणार आहे. त्याला आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मावेळी आपली पत्नी अनुष्का शर्मासोबत राहायचे असल्याने, त्याने बीसीसीआयकडे पालकत्व रजा मागितली होती. ही रजा मंजूर झाल्याने, तो भारतात परतेल. त्यानंतर उर्वरित तीन सामन्यात अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्त्व करताना दिसेल.
ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे केले कौतुक
याच मुलाखतीत सचिनने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचे कौतुक केले. सचिन म्हणाला, “ऑस्ट्रेलियाचा संघ यावेळी मागील वेळेपेक्षा अधिक मजबूत आहे. डेविड वॉर्नर, स्टीव स्मिथ व मार्नस लॅब्यूशाने यांच्या असल्याने फलंदाजी सक्षम झाली आहे. ते या मालिकेत छाप सोडण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. मात्र, भारतीय गोलंदाजांकडे देखील त्यांना आव्हान देण्याची क्षमता आहे.”
मागील दौऱ्यावेळी स्मिथ-वॉर्नर होते निलंबित
मागील दौऱ्यावेळी ऑस्ट्रेलियन संघात स्टीव स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांचा समावेश नव्हता. २०१८ मध्ये चेंडू छेडछाड प्रकरणामुळे या दोघांवर एक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. या दौर्यात भारताने २-१ ने विजय मिळवला होता. भारतीय संघाने या विजयासह प्रथमच ऑस्ट्रेलियात मालिका विजय साजरा केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल १० खेळाडू कसोटी मालिकेपूर्वी परतणार भारतात, पाहा संपूर्ण यादी
विराट! शेतकरी मोर्चात सहभागी हो, चिडून चाहत्याने केले आवाहन
पाकिस्तान क्रिकेटला अच्छे दिन, तब्बल १४ वर्षांनी ‘हा’ संघ करणार पाकिस्तान दौरा
ट्रेंडिंग लेख-
शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ
अठरा वर्षांची ‘छोटीशी’ क्रिकेट कारकीर्द खेळलेला ‘पार्थिव पटेल’
अवघ्या अठराव्या वर्षी पार्थिव पटेल खेळला चक्क विश्वचषक; वाचा कशी झाली कारकिर्दीची सुरुवात