भारतीय क्रिकेट संघ आज जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात परिपूर्ण आहे. अव्वल फलंदाज, मेहनती वेगवान गोलंदाज, चपळ क्षेत्ररक्षक व दर्जेदार फिरकी गोलंदाज या भारतीय संघाच्या सर्व बाजू भक्कम आहेत. २५-३० वर्षांपासून भारतीय क्रिकेटमध्ये सुरू झालेल्या आमूलाग्र बदलाचे फलित म्हणून भारत आज या ठिकाणी आहे.
जेव्हापासून क्रिकेट खेळायला सुरुवात झाली, तेव्हापासून भारतीय संघ फिरकी गोलंदाजी विभागात सर्वशक्तिशाली समजला जात. बाळू पानवलकर, सुभाष गुप्ते, दत्तू फडकर, इरापल्ली प्रसन्ना, चंद्रशेखर, बिशनसिंग बेदी यांनी १९८० पूर्वी आपल्या फिरकीने भल्याभल्यांना नामोहरम केले. त्यानंतरच्या काळात अनिल कुंबळे, हरभजन सिंह, आर अश्विन हे देखील त्यांची परंपरा पुढे चालवत राहिले. भारतीय फिरकीच्या या दैदिप्यमान इतिहासातील सर्वात महत्वपूर्ण व आदरणीय नाव म्हणजे दिग्गज फिरकीपटू व भारताचे माजी कर्णधार राहिलेले बिशनसिंग बेदी. आज (२५ सप्टेंबर) बेदींचा ७६वा वाढदिवस.
पंजाबच्या अमृतसर येथे जन्मलेले बेदी लहानपणापासून अमृतसरच्या मैदानांवर क्रिकेट खेळत. डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणाऱ्या बेदी यांनी वयाच्या तेराव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अवघ्या दोन वर्षात ते सर्वप्रथम उत्तर पंजाबसाठी वरिष्ठ स्तरावर क्रिकेट खेळले. गुणवत्ता ठासून भरलेल्या बेदी यांच्या गोलंदाजीचे कौतुक सर्वजण करत. चार वर्ष देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर, १९६६ मध्य वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी त्यांची भारतीय संघात निवड करण्यात आली.
बेदी यांची गोलंदाजीची शैली अत्यंत सहज व सोपी होती. चेंडूला उंची देण्यात ते जराही घाबरत नसत. त्यांच्या गोलंदाजीत विविधता असल्याने, फलंदाजाला त्यांना समजणे कठीण होऊन बसतं. बेदी यांच्या संघात असण्याने कर्णधार निश्चिंत असत कारण, बेदी संपूर्ण दिवस गोलंदाजी करण्यास सक्षम होते. बेदी यांच्याबद्दल असेही म्हटले जात की, ते सराव करताना १० पैशाचे नाणे खेळपट्टीवर ठेवून तासनतास त्या नाण्यावर टप्पा टाकत.
भारतीय संघात खेळत असतानाच, १९६९ मध्ये दिल्ली रणजी संघात सामील झाले. त्या वर्षीपासून त्यांच्या गोलंदाजीत कमालीची सुधारणा झाली. त्यावर्षी भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी, अवघ्या दोन सामन्यात २१ बळी मिळवण्याची किमया केली. १९७४ च्या हंगामात ६४ बळी मिळवून त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमधील विक्रम रचला. बेदी यांची कौशल्ये पाहून,१९७२ मध्ये नॉर्दम्पटनशायर काउंटी क्लबने त्यांच्याशी करार केला. ते सहा वर्ष नॉर्दम्पटनशायरचा भाग राहिले. या सहा हंगामापैकी, दोन हंगामात त्यांनी १०० पेक्षा अधिक बळी मिळवले होते.
१९७५ च्या विश्वचषकात भारतीय संघ पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून पराभूत झाला होता. या सामन्यात सुनील गावसकर यांनी १७४ चेंडूत नाबाद ३६ धावा केल्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. बेदी त्या पहिल्या सामन्यातील संघात सहभागी नव्हते. स्पर्धेतील भारताचा दुसरा सामना पूर्व आफ्रिकेविरुद्ध होता. या सामन्यात खेळताना, बेदी यांनी १२ षटकांत आठ निर्धाव षटके टाकली आणि अवघ्या सहा धावा देत एक बळी मिळवला. एकदिवसीय सामन्यात आठ निर्धाव षटके मारणारे बेदी केवळ दुसरे गोलंदाज होते. लान्स गिब्ज यांच्यानंतर सर्वाधिक निर्धाव षटकांची सरासरी बेदी यांनी राखली होती.
बेदी यांनी इरापल्ली प्रसन्ना व भागवत चंद्रशेखर यांच्यासमवेत एकवेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर राज्य केले होते. जगभरातील प्रत्येक खेळपट्ट्यांवर या त्रिकुटाने आपली दहशत जमविली होती. १९७६ मध्ये वेस्ट इंडीज दौर्यामध्ये वेस्ट इंडिज गोलंदाजांच्या घातक गोलंदाजीमुळे भारतीय खेळाडू त्रस्त झाले होते. दोन खेळाडू जखमी झाल्याने मैदानाबाहेर गेले. बेदी यांनी याच कारणास्तव भारताचा डाव अकाली घोषित केला.
बेदी यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत, ६७ कसोटी सामने खेळत २६६ बळी मिळवले. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये बेदी यांच्या नावे तब्बल १,५६० बळी जमा आहेत. कोणत्याही भारतीय गोलंदाजाकडून हा एक विक्रम आहे. बेदी यांना भारताकडून अवघे १० एकदिवसीय सामने खेळायला मिळाले होते, ज्यात ते फक्त ७ बळी मिळवू शकले. बेदी यांनी २२ सामन्यात भारताचे नेतृत्वदेखील केले. त्यापैकी ६ सामन्यात भारताला विजय मिळवता आला.
फिरकी गोलंदाजीचे पितामहा मानले गेलेले जिम लेकर बिशनसिंग बेदी यांचे कौतुक करताना म्हणतात, “माझ्या स्वर्गाची कल्पना अशी आहे की, एका बाजूने बिशनसिंग बेदी व दुसर्या बाजूने रे लिंडवॉल यांनी दिवसभर गोलंदाजी करावी व मी पाहत बसावे. बेदी यांच्याकडे असामान्य कौशल्य होते. ते एकसारखी व एका टप्प्यावर मनमोहक अशी गोलंदाजी करू शकतात.”
निवृत्तीनंतर, बेदी यांनी भारतीय निवडसमितीचे अध्यक्षपद, भारतीय संघाचे व्यवस्थापक, प्रशिक्षक, मार्गदर्शक तसेच विविध समित्यांचे सदस्य अशा अनेक भूमिका निभावत, क्रिकेटशी आपले नाते कायम ठेवले. जेव्हा शेन वॉर्नला सचिन तेंडुलकरच्यासमोर गोलंदाजी करायला असहज वाटत होते, तेव्हा वॉर्नने बेदी यांचे मार्गदर्शन घेऊन सचिनला बाद केले होते.
बेदी हे आपल्या क्रिकेट कारकिर्दीत आणि निवृत्तीनंतरही अनेक वादात सापडले आहेत. आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बेदी यांनी दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याला गोलंदाज मानण्यास नकार दिला होता. तसेच, भारताच्या हरभजन सिंहला देखील त्यांनी अनेकदा गोलंदाजीवरून खडे बोल सुनावले होते.
मुरलीधरनविषयी ते म्हणतात, “हा गोलंदाज नाहीतर एक भालाफेकपटू आहे. मी त्याला आव्हान देतो की त्याने, चेंडू अवैधरित्या न फेकता बळी मिळवून दाखवावेत. मुरलीने घेतलेले सर्व बळी मी धावबाद मानतो.”
आपला मुलगा अंगद बेदी याला आपल्या प्रतिष्ठेचा वापर करून दिल्ली संघात समाविष्ट केल्यामुळे त्यांच्यावर खूप टीका झाली होती. याचसोबत बेदी यांनी “टी२० क्रिकेट म्हणजे क्रिकेटचा सर्वात किळसवाणा प्रकार आहे” असे जाहीर वक्तव्य केले होते.
विस्डेनने जाहीर केलेल्या, भारताच्या सर्वकालीन महान संघात बेदी यांचा समावेश केला होता. आयसीसीने बेदी यांच्या योगदानाबद्दल २००९ मध्ये त्यांचा हॉल ऑफ फेम मध्ये त्यांचा योग्य सन्मान केला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबादच मैदान मारताच कॅप्टन रोहित करणार ‘नऊ नंबरी’ पराक्रम
मोठ्या बातमीच्या आशेने चाहत्यांनी टवकारले कान! एमएस धोनीने केले ‘हे’ जाहीर
तिसऱ्या टी20साठी रिषभ पंतचा पत्ता कट? जाणून घ्या कारण आणि भारताची संभावित प्लेईंग 11