---Advertisement---

ज्या ऑस्ट्रेलियामुळे विश्वचषक खेळता आला नाही त्यांनाच फायनलमध्ये घरचा रस्ता दाखवणारा क्रिकेटर

On: मंगळवार, ऑगस्ट 25, 2020 5:01 PM
---Advertisement---

१९८२ ला श्रीलंकेने त्यांच्या क्रिकेट इतिहासातील पहिला कसोटी सामना खेळला. त्यांनतर १९८५ ला भारताविरुद्ध पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचाही पराक्रम केला. हा मालिका विजय ज्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने मिळवला होता, त्याचे नाव होते लुईस रोहन दुलीप मेंडिस. जो सर्वांना दुलीप मेंडिस म्हणून माहित आहे.

दुलीप मेंडिसचा जन्म २५ ऑगस्ट १९५२ ला मोराटुवा, कोलंबो येथे झाला. त्याने सेंट सेबेस्टाईन्स कॉलेज आणि सेंट थॉमस कॉलेज येथून शिक्षण घेतले. त्यावेळी तो या दोन्ही कॉलेजच्या २० वर्षांखालील संघाचा कर्णधार होता. त्यावेळी श्रीलंका नुकतेच त्यांची क्रिकेटमध्ये ओळख मिळवण्याच्या प्रयत्नात होता.

मेंडिसने १९७५ ला मँचेस्टर येथे वेस्ट इंडिजविरुद्ध श्रीलंकेच्या संघाकडून वनडे पदार्पण केले होते. परंतु त्यावेळी श्रीलंकेला कसोटी क्रिकेटचा दर्जा नव्हता. पण श्रीलंका प्रथम श्रेणी सामने खेळत होते. १९७२ ला मेंडिसने पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला होता. त्यावेळी त्याने सिलोन बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हन संघाकडून तमिळनाडू विरुद्ध पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला होता. त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पहिल्या डावात ५२ आणि दुसऱ्या डावात ३४ धावा केल्या होत्या. पुढे त्याला श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघातही संधी मिळाली. परंतु पहिले १९८२ पर्यंत त्याला केवळ ४ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली.

त्याला १९७५ ला श्रीलंकेकडून पहिल्यांदा विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली होती. परंतु ऑस्ट्रेलियाच्या जेफ थॉम्पसनचा बाऊंसर त्याच्या डोक्यावर आदळला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागले. त्याच्यानंतर सुनील वेट्टीमुनी देखील २ यॉर्करमुळे पायाला फ्रॅक्चर झाल्याने मेंडिससह हॉस्पिटलमध्ये दाखल झाला.

या विश्वचषकानंतर ७ वर्षांनी श्रीलंकेला कसोटीचा दर्जा मिळाला आणि श्रीलंकेने इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. त्यावेळी श्रीलंकेचा उपकर्णधार असलेल्या मेंडिसला १७ आणि २७ अशा धावाच करता आल्या. तरी श्रीलंकेने इंग्लंडला डावात २२३ धावांवर रोखत चांगली सुरुवात केली होती. परंतु ५ दिवसांच्या क्रिकेटचा अनुभव नसलेल्या श्रीलंकेला नंतर इंग्लंडने सहज पराभूत केले.

असे असले तरी १९८२ हे वर्ष मेंडिससाठी खास ठरले. त्याने दुसऱ्याच कसोटीत पाकिस्तान विरुद्ध ५४ धावांची खेळी केली होती. तर त्यानंतर भारताविरुद्ध चेन्नई येथे खेळलेल्या कसोटीत २ शतके केली होती. या सामन्याआधी अनेकांना वाटले होते की कितीही झाले तरी भारताचेच या सामन्यात वर्चस्व राहिल. सुरुवात झालीही तशीच कपिल देव आणि मदन लाल यांनी श्रीलंकेच्या सलामीवीरांना लगेचच माघारी धाडले होते. परंतु नंतर रॉय डायस आणि मेंडिसने मिळून १५३ धावांची भागीदारी रचत भारताला टेंशन दिले. डायसने ६० धावांची खेशी केली. तर मेंडिसने १२३ चेंडूत १०५ धावांची खेळी केली. त्यावेळी अनेकांना मेंडिसची शैली गुंडप्पा विश्वनाथ यांच्यासारखी वाटली. पुढे रंजन मुद्गुले यांनी ४६ धावांची खेळी केली. त्यामुळे श्रीलंकेने पहिल्या डावात ३४६ धावांपर्यंत मजल मारली. भारतानेही सुनील गावस्कर आणि संदीप पाटिल यांच्या शतकांच्या जोरावर ५६६ धावांवर ६ बाद असताना डाव घोषित केला. पण पुन्हा एकदा मेंडिस आणि डायस भारतासाठी अडथळा ठरले.  दुसऱ्या डावात मेंडिस आणि डायसमध्ये ११० धावांची भागीदारी झाली.  यावेळीही मेंडिसने १०५ धावांची खेळी केली होती. त्यामुळे कसोटी सामन्यात दोन्ही डावात सारखी शतकी धावसंख्या करणारा तो पहिला क्रिकेटरटू ठरला. त्यावेळी डायसचे शतक थोडक्यात हुकले त्याने ९७ धावा केल्या. तो सामना अनिर्णित राहिला.

पुढे मेंडिसला कर्णधार करण्यात आले. १९८४ ला कर्णधार म्हणून इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या मेंडिसने लॉर्ड्सवर पहिल्या डावात १११ धावांची आणि दुसऱ्या डावात ९४ धावांची खेळी केली. तो सामना वेट्टीमुनीच्या १९० धावांच्या खेळीसाठी प्रसिद्ध आहे. हा सामना देखील अनिर्णित राहिला. आत्तापर्यंत श्रीलंकेला सामने अनिर्णित राखण्यात यश येत होते. परंतु त्यांना मालिका विजय मिळवता आला नव्हता. पण अखेर तो क्षणही आला. तोही शेजारच्या भारत देशाच्या संघाविरुद्ध.

१९८५ ला भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी श्रीलंकेचा कर्णधार मेंडिस होता. त्यावेळी मेंडिसने भारताविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यात ६२ च्या सरासरीने ३१० धावा केल्या होत्या. यात ३ अर्धशतके आणि १ शतकाचा समावेश होता. तसेच या मालिकेतील दुसरा सामना श्रीलंकेने जिंकला होता. तर पहिला आणि तिसरा सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे पहिल्यांदाच श्रीलंकेने कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता आणि विशेष म्हणजे त्यांच्या कर्णधाराचा म्हणजेच मेंडिसचा यात मोठा वाटा होता. तो कसोटी मालिका विजय मिळवणारा श्रीलंकेचा पहिला कर्णधार ठरला होता.

एवढेच नाही तर वनडेतही मेंडिसची कामगिरी चांगली होत होती. परंतु १९८५  नंतर त्याची कामगिरी ढासळत गेली. अखेर १९८८ ला लॉर्ड्सवर तो शेवटचा कसोटी सामना खेळला. पण शेवटच्या कसोटी सामन्यातही त्याने ५६ धावांची खेळी केली. यानंतर ७ महिन्यांनी त्याने पाकिस्तानविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळला.

क्रिकेटमधील निवृत्तीनंतर त्याने क्रिकेट प्रशासनात पाऊल टाकले. २०११ मध्ये त्याला श्रीलंकेच्या निवड समीतीचा अध्यक्ष करण्यात आले. तसेच नंतर त्याने ओमान देशाच्या संघाचे प्रशिक्षकपदही सांभाळले.

एवढेच नाही तर ज्या ऑस्ट्रेलियामुळे त्याला १९७५ ला विश्वचषकात दुखापत झाली त्याच ऑस्ट्रेलियाला १९९६ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत करुन विश्वविजेत्या झालेल्या श्रीलंका संघाचा तो व्यवस्थापक होता. अशा या मेंडिसने त्याच्या छोट्या कारकिर्दीतही श्रीलंकेसाठी मोठे योगदान दिले आहे. त्याला १९९६ ला श्रीलंकेचा दुसरा सर्वोच्च पुरस्कार ‘देशमान्य’ पुरस्कारानेही गौरविण्यात आले.

दुलीप मेंडिसची कारकिर्द –

२४ कसोटी – १३२९ धावा, ४ शतके, ८ अर्धशतके

७९ वनडे – १५२७ धावा, ० शतके, ७ अर्धशतके

ट्रेंडिंग लेख –

कसोटी डावात ५० चौकारांचा पाऊस पाडणारा जगातील एकमेव अवलिया, आजही आहे विक्रम अबाधित

८ तासांत कसोटीत त्रिशतक करणारे जगातील एकमेव फलंदाज, ४६ चौकारांचा दिला गोलंदाजांना प्रसाद

‘धोनी रोज पितो ५ लिटर दूध’ सारख्या लहानपणी तुम्ही ऐकलेल्या क्रिकेटबद्दलच्या ५ खोट्या गोष्टी

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएलदरम्यान खेळाडूंच्या सुरक्षेबाबत बीसीसीआय सज्ज, ही कंपनी करणार २० हजारपेक्षा अधिक चाचण्या

द्विशतक ठोकणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजाने आयसीसी क्रमवारीत घेतली मोठी झेप; पहा विराट कोहली कोणत्या स्थानी

एकेकाळी कर्णधारपदावरून काढत वगळले होते संघातून, आता त्याच खेळाडूने ठोकले त्रिशतक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---