अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारी(१२ मार्च) पहिला टी२० सामना खेळवण्यात आला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात इंग्लंडने ८ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंडचा संघ दंडाला काळी पट्टी बांधून खेळत होता.
…म्हणून इंग्लंड खेळाडूंनी बांधली काळी पट्टी
इंग्लंड संघ पहिल्या टी२० सामन्यात काळी पट्टी बांधून उतरला होता. कारण काही दिवसांपूर्वी, ८ मार्च रोजी इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू जोई बेंजामिन यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांचे वय ६० वर्षे होते. त्यांच्या स्मरणार्थ इंग्लंड खेळाडूंनी दंडाला काळी पट्टी बांधली होती.
बेंजामिन यांची कारकिर्द
सेंट किट्समध्ये २ फेब्रुवारी १९६१ रोजी जन्म झालेले बेंजामिन वयाच्या १५ व्या वर्षी कुटुंबासमवेत इंग्लंडला स्थायिक झाले. त्यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात बर्मिंगहॅम लीग क्रिकेटमधून केली. तरी त्यांना काऊंटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी वयाच्या २७ व्या वर्षापर्यंत वाट पाहावी लागली. पण त्यांनी वार्विकशायरकडून काऊंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण संघात ऍलेन डोनाल्ड, ग्लॅडस्टोन स्मॉल आणि टीम मंटन असे गोलंदाज असल्याने त्यांना सातत्याने संधी मिळत नव्हती.
त्यानंतर त्यांना १९९२ मध्ये सरे संघासाठी खेळण्याची संधी मिळाली. याच संघातून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांना इंग्लंड संघासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळाली होती. साल १९९२ च्या हंगामात त्यांनी सरे संघाकडून खेळताना एकूण ६४ विकेट्स घेतल्या होत्या.
त्यांनी इंग्लंड संघासाठी १९९४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. परंतु, त्यांना एकच कसोटी सामना खेळायची संधी मिळाली. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळलेल्या कसोटी सामन्यात त्यांनी ४ विकेट्स घेतले होते. त्यांची १९९४ सालीच इंग्लंडच्या वनडे क्रिकेट संघात देखील निवड झाली होती. परंतु, त्यांना साजेशी कामगिरी करता आली नाही. २ वनडे सामने खेळत त्यांनी १ विकेट घेतली होती.
पण त्यांची प्रथम श्रेणी आणि अ दर्जाच्या क्रिकेटमधील एकूण कामगिरी चांगली राहिली. बेंजामिन यांनी प्रथम श्रेणी आणि अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये मिळून तब्बल ५६० विकेट्स घेतले होते. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण १२६ सामने खेळले. यात त्यांनी ३८७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्यांनी खेळलेल्या १६८ अ दर्जाच्या क्रिकेट सामन्यांमध्ये १७३ विकेट्स घेतल्या आहेत.
इंग्लंडचा भारतावर विजय
पहिल्या टी२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १२४ धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने २१ धावा केल्या. अन्य फलंदाजांना फार काही करता आले नाही. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
तसेच त्यानंतर १२५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून जेसन रॉय आणि जोस बटलर यांनी ७२ धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला. बटलर २८ धावा करुन बाद झाल्यानंतरही रॉयने डेविड मलानसह डाव पुढे नेला. पण रॉय ४९ धावा करुन बाद झाला.
त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि मलानने आणखी विकेट न गमावता इंग्लंडचा डाव पुढे नेला. नंतर १६ व्या षटकात मलानने षटकार ठोकत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मलानने नाबाद २४ धावा केल्या. तर बेअरस्टोने नाबाद २६ धावा केल्या. भारताकडून युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी १ विकेट घेतली.
इंग्लंडने या विजयासह ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता पुढील सामना १४ मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सुपरमॅन केएल राहुल! हवेत सूर मारत रोखला षटकार, व्हिडिओ होतोय व्हायरल
चहलने शंभरावा सामना बनविला संस्मरणीय; बुमराहला पछाडत ‘या’ यादीत पोहचला पहिल्या क्रमांकावर
अकरा वर्षांनी रोहित शर्मानंतर भारतीय खेळाडूने केली ‘अशी’ कामगिरी, अय्यरच्या नावे खास विक्रमाची नोंद