भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला वाटते की, त्यांच्यापुढे सामना जिंकण्यापेक्षा मोठे आव्हान म्हणजे ‘बेंच स्ट्रेंथ’ तयार करणे आहे. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला आहे. या विजयानंतर रोहितने महत्वाची प्रतिक्रिया दिली. भविष्यासाठी भारतीय संघ भक्कम करण्याची जबाबदारी रोहितने स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे.
पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, “जर तुम्हाला बेंच स्ट्रेंथ बनवायची असेल, तर आतापासूनच विचार करावा लागेल. तेव्हा कुठे भारतीय क्रिकेट सुरक्षित हातांमध्ये जाईल. हे माझ्यासमोरील आव्हानांपैकी एक आहे आणि माझी जबाबदारीही आहे. मी ही जबाबदारी माझ्या खांद्यांवर घेतली आहे की, हा बेंच स्ट्रेंथ तयार करायचा आहे आणि खूप साऱ्या गोष्टींवर लक्ष द्यायचे आहे. हे माझ्यासाठी सामना जिंकण्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे की, या खेळाडूंना कसे खेळवायचे, जे संघाबाहेर बसले आहेत आणि त्यांना आत्मविश्वास कसा देता येईल.”
रोहित पुढे म्हणाला, “जेव्हा त्यांना सामन्यात संधी मिळेल, त्येव्हा त्यांना स्पष्टपणे माहिती पाहिजे की, त्यांना काय करायचे आहे. यातून आमच्या प्रदर्शनावर परिणाम पडेल. मग आम्ही जिंकू किंवा पराभूत होऊ.” रोहितच्या मते खेळाडूंकडून मैदानात येताच विजयाची अपेक्षा ठेवता येत नाही. “तुम्ही असे म्हणू शकत नाही की, तुला सामने जिंकवून द्यावे लागतील. सामना जिंकण्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टी कराव्या लागतात,” असे रोहित पुढे बोलताना म्हणाला.
“बेंच स्ट्रेंथ तयार करण्यासाठी खेळाडूंसमोर गोष्टी स्पष्ट करणे गरजेचे आहे, त्यांच्यासाठी चांगले वातावरण बनवण्याची गरज आहे, जेणेकरून आनंदी वातावरणात राहून ते मैदानात जातील आणि त्यांचे काम करतील. त्यांनी जास्त दबाव घ्यायला नको. जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असता, तेव्हा दबाव असतो. पण बाहेरचा दबाव नसला पाहिजे.” असे रोहित म्हणाला.
दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने मोठा विजय मिळवला. रोहितच्या नेतृत्वातील भारतीय संघाने सामन्यात अप्रतिम प्रदर्शन केले आणि एक डाव २२२ धावांनी श्रीलंकेचा पराभव केला. उभय संघातील दुसरा कसोटी सामना १२ मार्चपासून बेंगलोरमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना दिवस-रात्र स्वरुपातील असून गुलाबी चेंडूने खेळला जाईल.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२२ वेळापत्रकात ‘या’ तारखेला होणार रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे सामने, वाचा सविस्तर
जरा इकडे पाहा! आठ गोलांनंतरही गोवा अन् केरलामधील सामना सुटला बरोबरीत