कोरोनाच्या दुसर्या लाटेने भारतात सध्या कहर केला आहे. भारतात प्रचंड वेगाने कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. याच दरम्यान बायो बबल मध्ये आयपीएल खेळवले जात असले तरी कोरोनाच्या भितीमुळे अनेक खेळाडूंनी माघार घ्यायला सुरुवात केली आहे.
आत्तापर्यंत ७ खेळाडूंनी माघार घेतली असून यात ६ परदेशी तर एका भारतीय खेळाडूचा समावेश आहे. त्यामुळे आता आयपीएल मध्यातच स्थगित होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर बीसीसीआयने स्पष्टीकरण दिले आहे.
बीसीसीआयने जाहीर केली भूमिका
आयपीएल मधून आत्तापर्यंत ७ खेळाडूंनी माघार घेतली आहे. यातील दोन खेळाडूंनी दुखापतीमुळे माघार घेतली असली तरी उर्वरित खेळाडूंनी कोरोनाच्या चिंतेमुळेच माघार घेतली आहे. यात अँड्रयू टाय, लिआम लिव्हिंगस्टोन, केन रिचर्डसन, अॅडम झाम्पा या ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा तर आर अश्विन या भारतीय खेळाडूचा समावेश आहे. एकापाठोपाठ या खेळाडूंनी घेतलेल्या माघारीने आयपीएलच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र आता बीसीसीआयने स्पष्टीकरण देत या सगळया प्रश्नांना पूर्णविराम दिला आहे.
बीसीसीआयने आयपीएल सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कोणीही खेळाडू आयपीएल सोडून जाणार असले तरी त्याने आयोजनावर परिणाम होणार नसल्याचे एका बीसीसीआय अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर उघड केले. त्याचवेळी आरसीबीने जारी केलेल्या पत्रकात “केन रिचर्डसन आणि अॅडम झाम्पा वैयक्तिक कारणाने मायदेशी परतत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर एक संघ म्हणून या निर्णयात त्यांच्यासह आहोत आणि शक्य असेल ती मदत देखील करत आहोत”, असे सांगण्यात आले आहे.
त्यामुळे आता आयपीएल मध्यातच स्थगित केली जाणार का, या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. उर्वरित सामने देखील नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडतील.
महत्वाच्या बातम्या:
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये भीतीचं वातावरण
मोठ्या मनाचा माणूस! कोरोना संकटात पुणेकरांच्या मदतीला धावला हरभजन सिंग, केली ही मोलाची मदत
कौतुकास्पद! एकीकडे परदेशी खेळाडू माघार घेत असताना पॅट कमिन्स आला भारतातील कोरोनाग्रस्तांच्या मदतीला