भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी सिरीजमधील अखेरचे दोन सामने उरले आहेत. या मालिकेतील तिसरा सामना ७ जानेवारीपासून सिडनी येथे होणार असून, चौथा आणि शेवटचा सामना १५ जानेवारीपासून ब्रिस्बेनमध्ये खेळला जाणार आहे. मात्र आता अशी माहिती पुढे येत आहे की, भारतीय संघ ब्रिस्बेनला जाण्यास तयार नाही. त्यांना सिडनी येथेच चौथा कसोटी सामना खेळायचा आहे. परंतु ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅथ्यू वेड याने याउलट वक्तव्य केले आहे.
..म्हणून भारतीय संघाला सिडनीत खेळायचाय चौथा कसोटी सामना
माध्यमांतील वृत्तानुसार, भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात पोहोचण्यापूर्वी दुबईत १४ दिवस क्वारंटाईनमध्ये रहावे लागले होते. यानंतर ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यानंतर त्यांना पुन्हा १४ दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण करावा लागला होता. म्हणजे भारतीय संघ जवळपास १ महिना क्वारंटाईनमध्ये राहिला आहे. अशात चौथ्या कसोटीसाठी ब्रिस्बेनला गेल्यास परत भारतीय संघाला एका रुममध्ये कैद रहावे लागणार आहे. त्यामुळे त्यांनी चौथा कसोटी सामना ब्रिस्बेनऐवजी सिडनी येथे खेळवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मॅथ्यू वेडचे वक्तव्य
याविषयी बोलताना मॅथ्यू वेड म्हणाला की, “यासंदर्भात अजूनही माझ्या कानावर काही आलेले नाही. पण आम्हाला माहिती आहे की, निश्चितपणे सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सलग दोन सामने खेळवले जाणार नाहीत. पूर्ण कार्यक्रम आधीपासूनच ठरलेला आहे आणि आम्हाला त्यानुसारच पुढे जायचे आहे. मग ते क्वारंटाईन राहण्यासाठी ठरलेले हॉटेल असो वा सामन्याचे मैदान.”
सोमवारी (३ जानेवारी) भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी सिडनीला रवाना होणार आहेत. तिथे ७ जानेवारी ते ११ जानेवारी या कालावधीत तिसरा कसोटी सामना होईल. परंतु चौथ्या कसोटी सामन्याच्या ठिकाणावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-