ढाका। 19 वर्षांखालील एशिया कप 2018 स्पर्धेत भारतीय संघाने आज (4 आॅक्टोबर) बांगलादेशचा उपांत्य सामन्यात 2 धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
या सामन्यात भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी 173 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला 46.2 षटकात 170 धावाच करता आल्या.
बांगलादेशकडून शमिम हुसेनने अर्धशतकी खेळी केली. त्याने 81 चेंडूत 59 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याच्या व्यतिरिक्त बांगलादेशकडून यष्टीरक्षक फलंदाज अकबर अलीने चांगली लढत दिली.
त्याने 63 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्याने 45 धावांची खेळी केली. पण या दोघांव्यतिरिक्त बांगलादेशच्या अन्य फलंदाजांना मात्र खास काही करता आले नाही.
भारताकडून मोहित जांग्राने आणि सिद्धार्थ देसाईने अनुक्रमे 25 आणि 35 धावा देत प्रत्येकी 3 विकेट घेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. तसेच भारताच्या अन्य गोलंदाजांपैकी अजय गंगापुरमने 26 धावांत 1 विकेट आणि हर्ष त्यागीने 29 धावांत 2 विकेट्स घेतल्या.
तत्पुर्वी, भारताकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक 37 धावांची खेळी केली. तसेच अनुज रावत(35), समीर चौधरी(36), अयुष बाडोनी(28) आणि अजय गंगापुरम(17) यांनी थोडीफार लढत दिली. मात्र अन्य फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही.
पण जयस्वाल आणि अनुजने दुसऱ्या विकेटसाठी केलेली 66 धावांची भागीदारी आणि आयुषबरोबरच समीरने सहाव्या विकेटसाठी केलेली 59 धावांची भागीदारी महत्त्वाची ठरली. यांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने 49.3 षटकात सर्वबाद 173 धावा केल्या.
बांगलादेशकडून शोरिफुल इस्लामने 16 धावांत सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तसेच अन्य गोलंदाजांपैकी म्रित्युंजय चौधरी(2/27), रिषद हुसेन (2/36), कर्णधार तोव्हित हिरदॉय (2/4) आणि मिनहाझुर रेहमान (1/19) यांनी विकेट घेतल्या.
या सामन्याचा सामनावीर म्हणून मोहित जांग्राला घोषित करण्यात आले आहे. भारताचा अंतिम सामना रविवारी 7 आॅक्टोबरला ढाका येथे होईल. त्याआधी श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 5 आॅक्टोबरला उंपात्य सामना पार पडेल. या सामन्यातील विजेता अंतिम सामन्यात भारताबरोबर खेळेल.