कोणतीही स्पर्धा म्हटलं की, विक्रम हे होतातच. क्रिकेटमध्ये टी-२० हा प्रकार आल्यापासून खेळातली रंगत वाढत गेली. फलंदाज जलद गतीने धावा धावा करू लागले. जलद फलंदाजीने सामन्यातील रोमांच अधिक वाढला. आता आयपीएलच्या नव्या हंगामात सुरूवातीपासूनच सामन्यात रोमांच पाहायला मिळतो आहे. आयपीएलच्या या मोसमात फलंदाजांनी आतापर्यंतच्या गोलंदाजांपेक्षा अधिक प्रभावी खेळ दाखविला आहे. परंतु काही प्रसंगी गोलंदाजांनीही वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला आहे. आयपीएलमध्ये अशी चढउतार होतच राहतात.
प्रत्येक सामन्यात असा फलंदाज असतो जो स्वबळावर आपल्या संघाला विजय मिळवून देतो. तसेच खरतर क्रिकेटमध्ये शेवटची षटके खूप महत्वाची मनाली जातात. त्यात टी-२० क्रिकेट म्हंटल कि, गोलंदाजांवर अधिक जबाबदारी असते कारण फलंदाज शेवटच्या काही षटकांत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत करतो. या लेखात आपण अशा ३ फलंदाजांबद्दल जाणून घेऊया ज्यांनी आयपीएलच्या एकाच सामन्यात शेवटच्या २ षटकांत सर्वाधिक धावा काढल्या आहेत.
आयपीएलच्या एकाच सामन्यात शेवटच्या २ षटकांत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
ब्रेंडन मॅक्यूलम (Brendan McCullum)
न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्यूलमने आयपीएलच्या पहिल्या हंगामात, म्हणजे २००८ मधील पहिल्याच सामन्यात केकेआरकडून खेळताना हा पराक्रम केला. पहिल्या हंगामातील पहिलाच सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर असा होता. या सामन्यात ब्रेंडन मॅक्यूलम सलामीला फलंदाजीला आला होता. त्याने यावेळी जबरदस्त फलंदाजी करत शेवटच्या दोन षटकांतील ११ चेंडूत ३९ धावा केल्या. त्याने या सामन्यात १० चौकार आणि १३ षटकारांच्या मदतीने ७३ चेंडूत नाबाद १५८ धावा करून आयपीएलमधील पहिले शतक देखील झळकावले.
केएल राहुल (KL Rahul)
आयपीएलच्या यंदाच्या १३ व्या हंगामातील सहाव्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळत कर्णधार केएल राहुलने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध अखेरच्या दोन षटकांतील ९ चेंडू खेळले आणि ४२ धावा काढल्या. आरसीबी विरुद्ध झालेल्या या सामन्यात राहुलने नाबाद १३२ धावा केल्या. हे त्याचे आयपीएलमधील दुसरे शतक ठरले. या सामन्यात केएल राहुलने १९० च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.
विराट कोहली (Virat Kohli)
आयपीएलच्या एकाच सामन्यात शेवटच्या दोन षटकांत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीने केला आहे. २०१६ मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध खेळताना कोहलीने हा विक्रम केला आहे. या सामन्यातील शेवटच्या २ षटकात कोहलीने १० चेंडूंचा सामना केला आणि ४४ धावा कुटल्या. सलामीला फलंदाजीला येत त्या सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावत गुजरातच्या सर्व गोलंदाजांचा धुव्वा उडवला होता.