नुकत्याच पार पडलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाने निराशाजनक प्रदर्शन केले. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयने काही महत्वाचे निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. रवी शास्त्रींचा संघासोबतचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविड यांनी संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली. तर द्रविडच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) प्रमुखाची जबाबदारी स्वीकारणार आहे. लक्ष्मणने हे पद स्वीकारल्यानंतर, त्याच्यावर भारतीय संघाच्या अनेक जबाबदाऱ्यांचे ओझे पडणार आहे.
लक्ष्मण सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत समालोचकाचे काम करत आहे. या मालिकेनंतर तो या १३ डिसेंबरला एनसीए प्रमुखाची जबाबदारी स्वीकारेल. कोलकाता येथे बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीत या गोष्टीची पुष्टी केली गेली की, लक्ष्मण १३ डिसेंबरपासून एनसीएमधील इतर प्रशिक्षकांसोबत जोडले जाईल.
बीसीसीआयच्या एका वरिष्ट अधिकाऱ्याने बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयाबाबत माहिती दिली. माध्यमांशी बोलताना या अधिकाऱ्याने सांगितले की, “लक्ष्मणच्या कराराची प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे. त्याची समालोचक म्हणून शेवटचे काम भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका आहे. त्यानंतर बेंगलोरमध्ये ते १३ डिसेंबरपासून कमान सांभाळेल.”
एनसीए प्रमुखपद स्वीकारल्यानंतर लक्ष्मणसमोर सर्वात पहिले आव्हान असेल, पुढच्या वर्षी होणारा १९ वर्षाखालील विश्वचषक. हा विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या काही काळापासून जूनियर क्रिकेट खूपच कमी प्रमाणात खेळले गेले आहे. अशात बीसीसीआय आगामी काळात जास्तीत जास्त जूनियर क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करून एक मजबूत संघ तयार करण्याच्या विचारात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण भारताच्या १९ वर्षांखालील संघासोबत वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दौऱ्यावर ऋषिकेश कानिटकर किंवा सितांशू कोटक यांच्यातील कोणीतरी मुख्य प्रशिक्षकाच्या रूपात संघासोबत जाईल.
कोटक सध्या भारत अ संघासोबत दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानंतर भारतीय संघ दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. कोरोनाच्या नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने भारताच्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यात काही बदल केले. भारतीय संघ आता या दौऱ्यावर तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळेल. तर टी२० मालिका नंतर आयोजीत केली जाणार आहे.