पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषकाआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डमध्ये (पीसीबी) बदल झाले आहेत. माजी अध्यक्ष एहसान मनी यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेल्या पीसीबीच्या चेअरमनपदी पाकिस्तान संघाचे माजी कर्णधार व प्रसिद्ध समालोचक रमीज राजा यांची वर्णी लागली आहे. राजा हे पुढील तीन वर्षासाठी पीसीबीचे चेअरमन असतील. अन्य कोणीही अर्ज न केल्याने त्यांची ही निवड बिनविरोध झाली.
अशी पार पडली प्रक्रिया
पाकिस्तानचे पंतप्रधान आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मानद प्रमुख इम्रान खान यांनी २७ ऑगस्ट रोजी राजा यांना पीसीबी चेअरमन पदासाठी नामांकित केले होते. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही या पदासाठी अर्ज केला नाही. गव्हर्निंग बॉडीच्या सर्व सहा सदस्यांनी आपले मत राजा यांच्या पारड्यात टाकले. राजा हे पीसीबीच्या ३६ व्या कार्यकाळातील ३० वे चेअरमन आहेत.
आधीच सुरू केली होती तयारी
पीसीबी चेअरमन पदासाठी राजा यांनी मनी यांच्या राजीनाम्यानंतर तयारी सुरू केली होती. त्यांनी पंतप्रधान इम्रान खान तसेच पाकिस्तान संघ व्यवस्थापन व पाकिस्तानी खेळाडूंची भेट घेतलेली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम व राजा यांचे संबंध अत्यंत मैत्रीपूर्ण आहेत. पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक मिसबाह उल-हक व गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनीस यांच्या राजीनाम्या मागे अप्रत्यक्षरीत्या राजा असल्याचे सांगितले जात होते.
पीसीबीमधील दुसरा कार्यकाळ
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजा यांनी समालोचक म्हणून प्रसिद्धी मिळवली. ते यापूर्वी २००३-२००४ या काळात पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. कारगिल युद्धानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील ताणलेले क्रिकेट संबंध पूर्ववत करण्यात राजा यांचा मोठा हात होता. तसेच, बॉब वूल्मर यांच्यासारखे प्रशिक्षक पाकिस्तान संघासाठी आणणे ही त्यांची कल्पना होती. पाकिस्तान क्रिकेटमध्ये आणखीन उत्कृष्ट बनवण्यासाठी राजा यांची मदत होईल असे सांगितले जात आहे.