भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक निवडीवर सुरु झालेला वाद शमण्याची काही चिन्हे नाहीत. काही दिवसांपूर्वीच भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची नियुक्ती बीसीसीआयने केली होती. मात्र या नियुक्तीवर अनेकांनी आक्षेप घेतला होता.
मागील वर्षीच डब्ल्यू.व्ही. रमण यांच्याकडे प्रशिक्षक पद असताना संघाने टी२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. असे असतानाही त्यांची प्रशिक्षक पदावरून उचलबांगडी करण्यात आल्याने क्रिकेट वर्तुळात नाराजी होती. आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
गांगुलीने निर्णयाबाबत व्यक्त केले आश्चर्य
बीसीसीआयने भारताचे माजी खेळाडू मदन लाल यांच्या अध्यक्षतेखाली एक क्रिकेट सल्लागार समिती नेमली होती. या समितीत मदन लाल यांच्या व्यतिरिक्त सुलक्षणा नाईक आणि आरपी सिंग यांचा समावेश होता. या समितीने एकूण आठ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. ज्यातून रमेश पोवार यांची प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे पोवार यांनी यापूर्वी पण महिला संघाचे प्रशिक्षक पद भूषवले होते. मात्र कसोटी आणि वनडे संघाची कर्णधार मिताली राज हिच्याशी झालेल्या वादानंतर त्यांना प्रशिक्षक पद सोडावे लागले होते.
आता या निर्णयावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने आश्चर्य व्यक्त केले आहे. एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार गांगुलीने आपली नाराजी व्यक्त केली आहे. या वृत्तात गांगुलीने डब्ल्यू.व्ही. रमण यांना प्रशिक्षक पदावरून हटवले गेल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. कारण मागील वर्षीच त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने टी२० विश्वचषकाचे उपविजेतेपद पटकावले होते.
याशिवाय रमण यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने खेळलेल्या पाच वनडे मालिकांपैकी चार वनडे मालिका जिंकल्या होत्या. केवळ दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मायदेशात झालेली मालिका भारताने गमावली होती. असा चांगला रेकॉर्ड असून देखील रमण यांना हटवल्याने आणि पोवार यांच्या नावे वादाचा पूर्वेतिहास असून देखील त्यांची नियुक्ती केल्याने गांगुलीने नाराजी प्रकट केली आहे.